Ajit Pawar – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कामाचा उरक, त्यांचे व्हिजन, त्यांची कामाची पद्धत येथपासून ते त्यांचे बालपण, त्यांची राजकीय कारकीर्द या सगळ्यांविषयी आठवणींचा पट बुधवारी श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने उलगडला. अजित पवार यांना पुणेकर नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी आयोजित केलेल्या विशेष सभेत श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांचा अस्थिकलश बालगंधर्व सभागृहाबाहेर दर्शनासाठी ठेवण्यात आला होता.अजित पवार यांना जन्मापासून ओळखणारे आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय उद्योजक विठ्ठलशेठ मणियार म्हणाले, की अजित गेल्याचा धक्का अजूनही सावरला जात नाही. अजितचे वडील गेल्यानंतर आलेला पोरकेपणा जाणून पवार साहेबांनी त्यांचे पितृपण घेतले. सामाजिक आवड पाहून त्याला संधी दिली. राष्ट्रीय राजकारणात जाताना साहेबांनी अजितकडे बारामतीची जबाबदारी सोपवली. वेळेचा शिस्तपणा अजितने साहेबांकडून घेतला होता.अजित साहेबांपासून दूर गेला, कुटुंबापासून, साहेबांपासून दूर गेला असे अनेकांना वाटले; पण त्याच्या मनात साहेबांविषयी वडिलकीची भावना होतीच. बालगंधर्व रंगमंदीर येथे अजित पवार यांच्या हस्ती कलशाचे दर्शन घेताना नागरीक. स्वतःचा गट निर्माण केल्यावर साहेबांचे मार्गदर्शन, छत्र हवे आहे. आपण साहेबांशी बोला आणि माझ्याबरोबर या, असे आम्हाला सांगितले होते. राजकारणात मला फारसा रस नाही; परंतु मला काही वाटले तर अजितला खडे बोलही सुनावत असे. आपल्यातून एक झंझावात निघून गेला आहे, असे म्हणताना मणियार भावूक झाले. अजितदादा हे राजकारणातील ‘नो रीप्लेसमेंट’ असलेला माणूस होता. असा माणूस होणे नाही, अशा शब्दांत सेना नेते सचिन अहिर यांनी श्रद्धांजली वाहिली. अजित पवारांचा आदर्श आजच्या तरुणांनी घेतला पाहिजे, असे सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले. याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, रुपाली चाकणकर, शांताराम जाधव आणि अभिजीत कटके, ऍड. अभय छाजेड, राजेंद्र पाटील, फत्तेचंद रांका, ऍड. एस. के. जैन, विद्याधर अनास्कर, डॉ. एस. एन. पठाण, डॉ. सदानंद मोरे, डॉ. मोहन आगाशे, आयुक्त नवल किशोर राम, नागराज मंजुळे, नंदकुमार काटकर, महेश झगडे, विद्या येरवडेकर, ब्रिजमोहन पाटील, संजय आवटे, उल्हास पवार आदींची भाषणे झाली.