Ajit Pawar – जर जनतेचे काम अडणार असेल, तर तिथं कोणाचीही गय केली जाणार नाही, हा अजित पवारांचा केवळ शब्द नाही, तर तो त्यांचा प्रशासकीय बाणा होता. मंत्रालयातील दालन असो वा जिल्ह्याची बैठक, दादांच्या शब्दाचा दरारा असा, की भल्याभल्या अधिकाऱ्यांच्या पोटात गोळा यायचा. हा दरारा कोणाला घाबरवण्यासाठी नव्हता, तर सामान्यांची कामे वेळेत व्हावीत, यासाठीचा होता. पवार यांची हीच कार्यशैली आज प्रशासकीय वर्तुळात आणि नागरिकांच्या मनात कायमची कोरली गेली आहे. अजित पवार यांच्या या कार्यशैलीमुळेच मुळेच रखडलेले प्रकल्प पूर्ण झाले आणि प्रशासनाला शिस्त लागली. माझा शब्द म्हणजे शासन, ही भावना त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केली.परखड मत मांडणाऱ्या या स्वभावामुळे अजित पवार यांचा प्रशासनामध्ये दरारा होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला जाणे म्हणजे एखाद्या कठीण परीक्षेला सामोरे जाण्यासारखे असे. हो- नाही किंवा बघू, करू, अशा मोघम उत्तरांना दादांच्या बैठकीला जागा नसायची. कामाला नकार देण्यापेक्षा तो मार्ग कसा निघेल, हे सांगा, अशी त्यांची स्पष्ट भूमिका असे. कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी वेळोवेळी सुधरा अन्यथा बदली, असा थेट इशारा दिला होता. या कडक शिस्तीमुळेच प्रशासन गतिमान झाले आणि सामान्यांच्या फाइल्सवर साचलेली धूळ झटकली गेली. अजित पवार अजित पवारांचा स्वभाव जेवढा परखड, तेवढेच त्यांचे मन निर्मळ. त्यांनी नेहमीच प्रशासनाला विश्वासात घेऊन निर्णय घेतले. मात्र, जिथे अधिकारी जाणीवपूर्वक काम रेंगाळत ठेवायचे, तिथे मात्र दादांचा आसूड ओढला जायचा. त्यांच्या या दराऱ्यामुळेच मंत्रालयातून सुटलेले आदेश शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायचे. अरे सरकार म्हणजे अजित पवारच ना वेळेत काम न करणाऱ्या लालफितीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे रिंगमास्टरच. मागील तीन वर्षांपूर्वी एका साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाच्या संदर्भात काम रोखून ठेवणाऱ्या एका अधिकाऱ्याला पवार यांच्या दादागिरीचा आसूड सहन करावा लागला. स्वतः अजित पवार आणि त्या खात्याच्या प्रधान सचिव यांना सांगूनसुद्धा त्या अधिकाऱ्याने काम करण्यास चालढकल केली. यावर पवार यांनी त्या अधिकाऱ्याला फोन लावला असता अधिकाऱ्यांनी कामे होत नसल्याचे खापर शासनावर फोडले. यावर पवार यांनी अरे सरकार म्हणजे अजित पवारच ना, या शब्दांत सुनावले होते. दादांच्या या एका वाक्याने त्या अधिकाऱ्याची बोलतीच बंद झाली आणि रेंगाळलेले काम तातडीने मार्गी लागले. हा केवळ संवाद नव्हता, तर कामाप्रती असलेल्या निष्ठेचा तो एक हुंकार होता.