Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीला जात असताना त्यांच्या चार्टर्ड Learjet 45 विमानाला बारामती विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. विमान धावपट्टीजवळ कोसळल्यानंतर प्रचंड स्फोट होऊन आग लागली, ज्यात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला.या अपघातानंतर अजित पवार यांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले होते. तेथे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले. बारामतीच्या जनतेने मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. अनेक समर्थक आणि कार्यकर्ते आपल्या ‘अजितदादा’ला शेवटचा निरोप देताना भावुक झाले होते. काही वेळ अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवल्यानंतर रात्री ते पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. अंत्यविधीचे कार्यक्रम आज (गुरुवार) सकाळी ९ वाजेपर्यंत पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. सकाळी ९ वाजता काटेवाडी येथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर समाप्त होईल. सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार पार पडतील. Ajit Pawar तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर अपघातानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. अंत्यविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांसह अनेक प्रमुख राजकीय नेते बारामतीत दाखल होणार आहेत. बारामती विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली असून NDRF आणि पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. विमान अपघाताचे प्राथमिक कारण दाट धुके आणि कमी दृश्यमानता असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका प्रमुख नेत्याचा अकाली अंत झाला असून संपूर्ण राज्य शोकमग्न आहे.