प्रभात वृत्तसेवा न्हावरे – शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात नव्हे तर थेट तळागाळातील कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी या निर्णयाचं स्वागत केल आहे तर काही ठिकाणी अस्वस्थता निर्माण झाली आहे. वरिष्ठ पातळीवर गुप्त बैठकांची लगबग सुरु असताना, खालच्या पातळीवर मात्र कार्यकर्त्यांचा संयम सुटू लागला आहे. कालपर्यंत ज्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरुन घोषणा दिल्या, आज त्यांच्याच झेंड्याखाली उभं राहायचं का…? असा संतप्त सवाल कार्यकर्ते उघडपणे विचारु लागले आहेत. महिनोन्महिने एकमेकांवर टीका, आरोप-प्रत्यारोप, व्यक्तिगत पातळीवरील संघर्ष आणि स्थानिक सत्ताकारणातील कुरघोड्या हे सगळं पाहिलेल्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ पातळीवर अचानक झालेला निर्णय पचनी पडलेला दिसत नाही. “आम्ही झेंडे फडकवले, सभा घेतल्या, विरोध सहन केला; आणि आता वर बसलेल्यांनी एका निर्णयात सगळं पुसून टाकायचं…?” अशी खदखद अनेक कार्यकर्त्यांच्या मनात आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची अवस्था ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ या गाण्याप्रमाणे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशीच झाली आहे.शिरुर नगरपालिकेत भाजपाचे सर्वाधिक ११ नगरसेवक निवडून आले. मात्र सुरवातीला दोन्ही राष्ट्रवादी पक्ष वेगवेगळे लढल्यानंतर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने राजकीय गणिते पूर्णतः बदलली. अन उपनगराध्यक्षपदी मितेश गादिया यांची निवड झाल्याने ‘भाजपा’ ला सर्वाधिक नगरसेवक निवडुन येऊनही अखेर विरोधी बाकावर बसावे लागले. त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी बाजी मारणार की ‘भाजपा’ चे उमेदवार निवडुन येणार हे येणारा काळचं ठरवेल.