प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – रामानंद सांप्रदायाच्या माध्यमातून धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी जपत शिरूर तालुक्यात जलसंवर्धनाचा मोठा उपक्रम राबविला जात आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनुयायांनी श्रमदानातून आत्तापर्यंत ३१ कच्चे बंधारे यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. वाढती पाणीटंचाई आणि घटती भूजल पातळी लक्षात घेऊन राबविलेली ही मोहीम आता लोकचळवळ ठरत आहे. तालुक्यातील शिक्रापूर, जातेगाव, करंदी, रांजणगाव गणपती, टाकळी भीमा, हिवरे, कोरेगाव भीमा, पाबळ, कासारी, निमगाव म्हाळुंगी, अण्णापूर, सणसवाडी, निर्वी, कोंढापुरी, आमदाबाद, कान्हूर मेसाई, कवठे यमाई, काठापूर, पिंपरखेड, खंडाळे आणि कारेगाव अशा एकूण २२ गावांमध्ये हे बंधारे बांधण्यात आले आहेत.या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. ज्याचा थेट फायदा परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि शेतीला दीर्घकाळ होणार आहे.या उपक्रमात युवक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून, हे सामाजिक एकात्मतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. तालुक्यातील विविध सेवा केंद्रांनी नियोजनबद्ध काम करत हे योगदान दिले आहे. शिरूर तालुका सेवा समितीने या कार्याचे कौतुक केले असून, येत्या काळात ही जलसंधारणाची सेवा अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.