प्रभात वृत्तसेवा पारगाव – महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आमदार अॅड. राहुल कुल यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई या प्रमुख शैक्षणिक केंद्रांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना विद्यमान शासकीय वसतिगृहांची क्षमता अपुरी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने तात्काळ नवीन वसतिगृहांची संख्या व क्षमता वाढवावी. तसेच वसतिगृह बांधकामासाठी जागा ताब्यात घेतल्यानंतर ठोस कालबद्ध कार्यक्रम जाहीर न झाल्याबाबत चिंता वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्रव्यापी एकसमान आणि ठोस कालबद्ध कार्यक्रम राबविणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत आमदार कुल यांनी मांडले. प्रश्नोत्तराच्या तासात अॅड. कुल यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “प्रत्येक जिल्ह्यात १०० मुलांसाठी व १०० मुलींसाठी असे स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात आले आहेत. स्वतंत्र स्वयंम आधार योजनेतून जिल्हानिहाय ६०० विद्यार्थ्यांना थेट मदत दिली जात आहे,” असे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले. तसेच संपूर्ण प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारी आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टीसीएस) कडे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (पीएमसी) म्हणून सोपवण्यात आली आहे. “टीसीएस ” च्या माध्यमातून सर्व प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) लवकरात लवकर तयार केले जातील. डीपीआर तयार होताच निविदा प्रक्रिया राबवून सर्व वसतिगृहांची बांधकामे वेळेत पूर्ण करण्यात येतील. शिवाय पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवडसारख्या शैक्षणिक केंद्रांतील वाढती गरज लक्षात घेऊन क्षमता वाढीचा विचारही सरकार सकारात्मकपणे करत आहे,” असे आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिले.