Radhakrishna Vikhe Patil – पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे मालक शासन असून पुरंदर उपसा जलसिंचन योजनेबाबतीतील मागण्या येणाऱ्या सहा महिन्यांत पूर्ण करणार असल्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. वाघापूर चौफुला येथे पार पडलेल्या शेतकरी सुसंवाद बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पुरंदर उपसा जलसिंचन योजना व जानाई-शिरसाई योजनेतील लाभार्थ्यांकडून विविध मागण्यांचे निवेदन विखे पाटील यांना देण्यात आले. यावेळी नुकताच सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून लाडकी बहिण योजनेमुळे लाडकी बहिण सक्षम झाल्याचे त्यांनी सांगीतले. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी हे दूषित असून या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने ते पाणी शुद्धीकरण करुन शेतीसाठी मिळावे या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सहा महिन्यांत सर्व मागण्या पूर्ण करणार असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे म्हणाले, वीर नदी व कऱ्हा नदी जोड प्रकल्प झाल्यावर पुरंदरचा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. इथ मालक बसलाय. त्यामुळे गडी काय करणार? असा उपरोधिक टोलाही टेकवडे यांनी लगावला. यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे, दिवे गराडे गटाच्या उमेदवार दिव्या जगदाळे, दिवे पंचायत समिती गणाचे उमेदवार देविदास कामठे, गराडे पंचायत समिती उमेदवार ललिता कटके, बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अजय इंगळे, माळशिरस पंचायत समितीच्या उमेदवार माऊली यादव व बेलसर पंचायत समिती गणाचे उमेदवार कैलास जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी येणाऱ्या निवडणुकीत भाजपला साथ द्या, असे आवाहन संजय जगताप, बाळासाहेब झिंजुरके, मंजुषा गायकवाड, नाना भामे, सदाशिव डोंबाळे, पी. एस. मेमाणे,कैलास कामथे, रवींद्र फुले यांनी केले. मेळाव्यासाठी दिवे – गराडे व बेलसर-माळशिरस गटातील शेतकरी उपस्थित होते.