Pune ZP Election – इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन व संचालक, तसेच विविध सहकारी तत्त्वावर चालणार्या संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आपल्या पाठीशी आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याचा अनुभव लाभल्यामुळे काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार आपल्या पाठीशी राहतील, असा विश्वास भाजप उमेदवार विलास वाघमोडे यांनी व्यक्त केला.राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू, निर्णयक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व भारतीय जनता पार्टीला लाभल्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विकासाची घडी वेगाने बसत असल्याचे त्यांनी सांगितले. याच सक्षम सत्तेच्या बळावर, पुणे जिल्हा परिषदेवर देखील भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील शेटफळ हवेली, काटी, लाखेवाडी, निरवांगी, सराफवाडी, रेडा, वरकुटे, रेडणी, खोरोची आदी गावांमध्ये मतदारांच्या भेटीगाठी दरम्यान उमेदवार विलास वाघमोडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या दौर्यात भाजप नेते प्रदीप गारटकर तसेच पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार लोकहिताच्या दृष्टीने योग्य पद्धतीने काम करत असून शेतकरी, गरीब मजूर, कष्टकरी, उपेक्षित घटकांना समान न्याय देण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून दरमहा मोठा दिलासा मिळत असून, हे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वाचे प्रतीक आहे. दमदार नेतृत्व आणि कामाचा अनुभव यांच्या जोरावर काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण आणि भरीव विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पंचायत राज व ग्रामविकास खात्याच्या सहाय्याने या मतदारसंघाचा विकासात्मक कायापालट केला जाईल. रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, गटार यांसारख्या मूलभूत सुविधा पुढील 50 वर्षांचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक गावात पुरवल्या जातील. या मतदारसंघातील प्रत्येक गावातील देवस्थानांना तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ग्रामीण भागाची धार्मिक व सांस्कृतिक नाळ विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचे काम भारतीय जनता पार्टी माध्यमातून केले जाईल, असा शब्द त्यांनी दिला.