शिरूर : सरसेनापती हंबीरराव मोहिते राष्ट्रीय प्रतिष्ठान, पुणे आणि रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रामलिंग (ता. शिरूर) यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे पराक्रमी सेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते तसेच स्वराज्य सौदामिनी छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ऐतिहासिक राष्ट्रगौरव शौर्य पुरस्कार सोहळा शिरूर शहरात उत्साहात पार पडला. शिरूर शहरातील बाबुरावनगर परिसरातील ज्ञानगंगा विश्व विद्यालयात झालेल्या या भव्य कार्यक्रमास इतिहासप्रेमी नागरिक, महिला, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. स्वराज्याच्या इतिहासातील शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करून देणारा हा सोहळा ठरला. कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्यात्या अर्चना भोर यांनी “हंबीरराव मोहिते यांची कन्या मी ताराराणी बोलते” या विषयावर प्रभावी व अभ्यासपूर्ण व्याख्यान सादर केले. त्यांच्या व्याख्यानातून छत्रपती महाराणी ताराबाई यांचे शौर्य, नेतृत्वगुण, राजकीय दूरदृष्टी आणि स्वराज्य रक्षणातील मोलाचे योगदान प्रभावीपणे उलगडले. उपस्थित श्रोते या व्याख्यानाने मंत्रमुग्ध झाले. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रा. डॉ. राजेराम प्रभू घावटे यांना राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार, अर्चना भोर यांना आदर्श महिला व्याख्यात्या पुरस्कार, निलेश काळे यांना राष्ट्रीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पुरस्कार, डॉ. सुनीता पोटे यांना राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार, संजयराव शितोळे यांना शिक्षण महर्षी राष्ट्रगौरव पुरस्कार, तृप्ती सरोदे यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार तर भाऊसाहेब दहिफळे यांना तालुकास्तरीय प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र ऊर्फ संग्रामसिंह मोहिते पाटील (अध्यक्ष, सरसेनापती हंबीरराव मोहिते राष्ट्रीय प्रतिष्ठान, पुणे), कुणालदादा मालुसरे (वंशज सुभेदार तानाजी मालुसरे), दीपकराजे शिर्के (वंशज महाराणी येसूबाई), अमितदादा गाडे (दूधमाता धाराऊ यांचे वंशज), सचिन दादा भोसले पाटील (नागपूरकर), महेंद्रजी नवले (गावगाडा इतिहास अभ्यासक) यांच्यासह सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज शुभम, आदित्य व सचिन मोहिते, सुप्रसिद्ध शिव व्याख्याते खालीलभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी उर्फ राणीताई कर्डीले यांनी केले. सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी तर समारोपप्रसंगी शामकांत वर्पे यांनी आभार मानले. यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप केंजळे, पत्रकार तेजस फडके (दैनिक प्रभात), अॅड. बाबुशेठ मोरे, अजय गायकवाड, बच्चूभाऊ गव्हाणे (राष्ट्रवादी शरद पवार गट – शिरूर तालुका युवा अध्यक्ष) आदींचीही उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना राजेंद्र ऊर्फ संग्रामसिंह मोहिते पाटील म्हणाले, “सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि महाराणी ताराबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिले जाणारे पुरस्कार चार भिंतींच्या सभागृहात मर्यादित न ठेवता हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयात घेण्यामागील उद्देश एवढाच आहे की या थोर व्यक्तिमत्त्वांचे संस्कार सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजावेत. या पुरस्कारांमुळे इतिहास नव्या पिढीचा मार्गदर्शक ठरेल.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीत इतिहासाबद्दल जागृती निर्माण होत असून राष्ट्रप्रेम आणि मूल्यांची जपणूक होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.