प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – कृषी विज्ञान केंद्र आयोजित ग्लोबल कृषी महोत्सवापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गणपीर बाबा डोंगरावरील वनक्षेत्राला गुरूवारी (दि. ८) दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. वाऱ्यामुळे आग पसरण्याची भीती निर्माण झाली होती, मात्र जुन्नर नगरपरिषद आणि विघ्नहर साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. यामुळे कृषी महोत्सवाच्या ठिकाणी उद्भवणारा संभाव्य धोका टळला आहे.या घटनेची माहिती ग्रामोन्नती मंडळाचे शिक्षक आशिष कोल्हे यांनी पोलीस पाटील सुशांत भुजबळ आणि नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगे यांना दिली. यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जुन्नर नगरपरिषद आणि विघ्नहर कारखान्याच्या बंबांसह नारायणगाव ग्रामपंचायतीचा फायर ब्रिगेड पंप वापरून आग विझवण्यात आली. या मोहिमेत वनपाल अनिता होले, खंडू भुजबळ, उपसरपंच योगेश पाटे, रेस्क्यू टीमचे सदस्य आणि कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.डोंगरावरील आगीमुळे वनसंपदेचे मोठे नुकसान झाले असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग वेळीच आटोक्यात आली नसती तर, लगतच्या कृषी प्रदर्शनापर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर, महोत्सवाच्या ठिकाणी भविष्यात अग्निशमन दलाचा बंब तैनात असणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.