प्रभात वृत्तसेवा पिरंगुट – भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यांत जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनियमितता, अर्धवट कामे तसेच कामे पूर्ण होण्यापूर्वीच ठेकेदारांची बिले अदा केल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत.या पार्श्वभूमीवर भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. दोषी अधिकारी व ठेकेदारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. याची गंभीर दखल घेत मंत्री पाटील यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवांना दिले आहेत. आमदार मांडेकर यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर त्यांनी मंत्री पाटील यांना निवेदन देत जलजीवन मिशनमधील सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार तीनही तालुक्यांतील जलजीवन मिशनच्या कामकाजाची चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत हक्क असून योजनांतील त्रुटी तातडीने दूर होणे आवश्यक असल्याचे आमदार मांडेकर यांनी सांगितले. अर्धवट कामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात यावेत, निकृष्ट व अनियमित कामांबाबत संबंधित ठेकेदार व अधिकार्यांवर दंडात्मक कारवाई करावी, तसेच जादा देयके अदा केली असतील तर ती तात्काळ वसूल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांची दक्षता व गुणवत्ता नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. जलजीवन मिशनच्या अपूर्ण कामांबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गावनिहाय पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी गटविकास अधिकारी, संबंधित पाणीपुरवठा अधिकारी, सरपंच-उपसरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचेही आमदार मांडेकर यांनी स्पष्ट केले.