आळंदी : 28 मार्च रोजी पंढरपूर येथे झालेल्या बैठकीनंतर काही माध्यमांमध्ये व वारकरी समाजात पालखी मुक्कामाबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. हे गैरसमज दूर करून अधिकृत माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे असे विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले. श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, आळंदी यांच्या वतीने मंगळवारी (दि. 31) पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आगामी आषाढी वारी पालखी सोहळा 2026 संदर्भातील नियोजन, अडचणी आणि गैरसमज दूर करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेस पालखी सोहळा मालक ऋषिकेश महाराज आरफळकर, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज लोंढे, अॅड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील तसेच व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते. पारंपरिकरित्या पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम भवानी पेठ येथील श्री पालखी विठोबा मंदिर येथे होतो. मात्र, वाढती वारकरी संख्या, मंदिर परिसरातील अपुरी जागा, अरुंद रस्ते, पार्किंगची कमतरता आणि दर्शनासाठी उभ्या राहणार्या रांगांमुळे वारकर्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः पावसाळ्यातील वारीदरम्यान महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची गैरसोय होत असल्याचे अधोरेखित करण्यात आले. दर्शनबारीमुळे रस्ते पूर्णपणे भरून जातात आणि आपत्कालीन व्यवस्थापनही कठीण होते. देवस्थान समितीने समाजमाध्यमे आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, पुण्यातील मुक्काम हलवला किंवा मुक्कामांची संख्या कमी होणार अशा अपुर्या व अनधिकृत बातम्यांवर विश्वास ठेवू नये. सर्व अधिकृत निर्णय केवळ देवस्थान समितीकडूनच जाहीर केले जातील. आषाढी वारी हा राज्यातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असल्याने त्याच्या नियोजनासाठी प्रशासन, देवस्थान, वारकरी समाज आणि स्थानिक यंत्रणा यांच्यात समन्वय आवश्यक आहे. यासाठी आगामी काळात आणखी बैठका घेऊन सर्व बाबींचे बारकाईने नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. पर्यायी जागेचा विचार, पण निर्णय प्रलंबित या अडचणी लक्षात घेऊन पुण्यातील मुक्कामासाठी पर्यायी जागेचा विचार सुरू आहे. यामध्ये रेसकोर्स मैदानासह इतर पर्यायांवर चर्चा झाली आहे. मात्र, कोणताही निर्णय घाईघाईने न घेता सर्व संबंधित घटक – दिडी समाज, मानकरी, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी – यांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. 13 एप्रिलला निर्णायक बैठक पालखी सोहळ्याच्या नियोजनासंदर्भातील सर्व मुद्द्यांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी दि. 13 एप्रिल 2026 रोजी आळंदी येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुक्कामस्थळ, सुविधा, वाहतूक व्यवस्थापन तसेच संपूर्ण कार्यक्रम पत्रिकेला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. पालखी प्रस्थान वेळेत बदल यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य अष्टमी, दि. 8 जुलै 2026 रोजी होणार असून, दिंडी समाजाच्या मागणीनुसार प्रस्थानाची वेळ दुपारी 4 ऐवजी दुपारी 3 वाजता करण्यात आली आहे. याशिवाय वारकर्यांना सुरक्षित व सुलभ वारी अनुभव मिळावा यासाठी सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये दर्शन व्यवस्था, गर्दी नियंत्रण, पावसाळ्यातील संरक्षण, स्वच्छता, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापन यांचा समावेश आहे.