प्रभात वृत्तसेवा मंचर – दिवाळीचा उत्सव संपून अनेक दिवस झाले असले तरी ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत फटाके फुटत असल्याचा आवाज कायम ऐकू येत आहे. मात्र, हे फटाके सणाचे नसून ‘बिबट्याला हूसंकावण्यासाठी’ वापरले जाणारे सुरक्षा उपाय असल्याचे वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागात ‘बिबट्या सुरक्षा अलर्ट’ सुरूच आहे. आंबेगाव, जुन्नर, शिरूर पट्ट्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या व इतर वन्यप्राण्यांची हालचाल वाढलेली आहे.रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना आणि जनावरांना धोका निर्माण होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी फटाक्यांवर अवलंबून राहण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, जोरदार आवाजामुळे बिबट्या दचकतो आणि वस्तीपासून दूर पळतो. हा उपाय कायमस्वरूपी समाधानकारक नसला तरी तात्पुरता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामीण भागात तो मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. काही गावांत तर रात्री लक्ष ठेवण्यासाठी पाळीव कुत्री, टॉर्च, हॉर्न आणि फटाके यांचे संयोजन (‘कॉम्बिनेशन’) तयार करण्यात आले आहे. शेतकरी आपल्या घरात दिवाळीतील शिल्लक फटाक्यांसोबत अतिरिक्त फटाकेही खास करून ठेवतात. शेतात किंवा वस्तीमध्ये बिबट्या दिसला किंवा कुत्र्यांच्या भुंकण्यावरून शंका आली की गावकरी त्वरित फटाके वाजवतात. आवाज होताच बिबट्या सावजापासून दूर पळतो, असा अनुभवही मंचर येथील उद्योजक अजय घुले आणि अनेकांनी सांगितला.या परिस्थितीमुळे आता “दिवाळी संपली तरी फटाक्यांचा आवाज कमी होत नाही” हे ग्रामीण भागातील नवे समीकरण झाले आहे. काही ठिकाणी रात्री १० नंतरही फटाक्यांचे स्फोट ऐकू येतात.मुलांना, महिलांना आणि वृद्धांना सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदारी वाढली आहे. “ग्रामीण भागातील ग्रामस्थ स्वतःच्या पद्धतीने ‘बिबट्या अलर्ट’ प्रणाली चालवत असून, वनविभागालाही या हालचालींची सतत माहिती दिली जात आहे.ग्रामस्थांच्या मते, वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे फटाके ही आता केवळ सणांची परंपरा न राहता जीव वाचवण्यासाठीचा तातडीचा उपाय बनला आहे.” – सागर काजळे, उपाध्यक्ष, भैरवनाथ पतसंस्था, मंचर.