प्रभात वृत्तसेवा मंचर – त्र्यंबकेश्वर-नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेता गर्दी व्यवस्थापन व इतर सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विविध विकासकामे गतीने पूर्ण करण्याबाबत नियोजन करावे, विकासकामे करतांना गुणवत्तापूर्वक, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७-गर्दी व्यवस्थापन व इतर सोई-सुविधा), विकास आराखडाबाबत आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे ग्रामीणचे उपधीक्षक दिलीप शिंदे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ.विलास वाहने, श्री क्षेत्र भीमाशंकरचे विश्वस्त यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महसूल, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, देवस्थानाचे पदाधिकारी आदींनी बैठक आयोजित करुन करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत माहिती देण्यात यावी. पोलीस प्रशासनाने वाहतूक नियोजन व गर्दी व्यवस्थापनाबाबत नियोजनाबाबत माहिती द्यावी. देवस्थानाच्या सूचना विचारात घेवून कार्यवाही करावी. कामासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या परवानग्या घेण्याची कार्यवाही करावी. पोलीस विभागाने नियंत्रण कक्ष उभारण्याबाबत कार्यवाही करावी.श्री क्षेत्र भिमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांकरिता असलेल्या सर्व बाजूंचा विचार करुन रस्त्याचे सर्वेक्षण करुन करावयाच्या कामकाजाबाबत अदांजपत्रक तयार करावे.पाणी पुरवठा विभागाने भाविकांना पुरेशा पाणी उपलब्ध होईल, याकरिता नियोजन करावे. टेंड सिटी उभारण्याबाबत सर्वेक्षण करावे एसटीपी बाबत सुधारित आराखडा तयार करून मान्यतेकरिता सादर करावा.निगडाळे येथील भाविक सुविधा केंद्र व वाहनतळाचे कामे करावीत.भाविकाच्या राहण्याच्यादृष्टीने टेंट सिटी उभारण्याबाबत वाहनतळाची जागा सोडून इतरत्र ठिकाणाचे सर्वेक्षण करावे.एकूणच श्री क्षेत्र भीमाशंकर येथील सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने करतांना भाविकांना त्रास होणार नाही, यादृष्टीने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.