प्रभात वृत्तसेवा आंबेठाण – खेड तालुक्यातील भामा नदीवर असलेले शेलू ते कुरकुंडी आणि कोरेगाव खुर्द ते कोरेगाव बुद्रुक या गावांना जोडणारे कोल्हापूर पद्धतीचे दोन बंधारे व त्यावरील पूल जीर्ण झाल्याने तेथील अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला असून, यामुळे अवजड वाहनचालकांना आता मोठा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. कोरेगाव खुर्द आणि बुद्रुक दरम्यानचा बंधारा सुमारे ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. हा बंधारा सध्या अत्यंत कमकुवत झाला असून, काही महिन्यांपूर्वी त्याच्या भरावाचा भागही ढासळला होता. एमआयडीसी भागात जाण्यासाठी कामगार, शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. शेलू येथील बंधाराही अवजड वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असल्याने, तेथूनही जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. नागरिकांना आता तळशेत ते धामणे किंवा पुणे-नाशिक महामार्गाचा वापर करावा लागणार असून, यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होणार आहे.या संदर्भात तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. सद्यस्थितीत या दोन्ही पुलांवरून केवळ दुचाकी आणि हलक्या वाहनांनाच परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक अभियंता अश्विन पवार, शाखा अभियंता शुभम सुसुंद्रे आणि कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी दिली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार असली तरी अपघाताचा धोका टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तत्काळ मोठे व रुंद पूल उभारण्याची गरज मागील अनेक वर्षांपासून भामा नदीच्या दोन्ही तीरावर असणारी दोन खोरी जोडण्यासाठी मोठा पूल उभारावा अशी मागणी केली जात आहे. पावसाळ्यात देखील या पुलांवरून पाणी गेल्याने हे पूल अनेक वेळा वाहतुकीसाठी बंद ठेवले जातात. सध्या अस्तित्वात असणारा धामणे येथील पूल आणि त्यानंतर भाम येथील पूल अशा दोनच मार्गावरून नागरिकांना आता अवजड वाहनांचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ या मार्गांना पर्यायी पूल म्हणून मोठे आणि रुंद पूल उभारण्याची गरज आहे. विशेषतः कोरेगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. किमान हा पूल तरी तत्काळ दुरुस्त करून अधिक रुंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी जोर धरली आहे.