प्रभात वृत्तसेवा राजगुरूनगर – खेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत आपली उघड नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उद्योजक सुधीर मुंगसे यांचा अजित पवार गटात होणाऱ्या प्रवेशाला मोहिते पाटील यांनी कडाडून विरोध केला असून, राजगुरूनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्ष नेतृत्वाने कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप केला. गरज भासल्यास दुसऱ्या पक्षात न जाता आपण राजकारणातून कायमची माघार घेऊ, असे खळबळजनक विधानही त्यांनी यावेळी केले.मोहिते पाटील म्हणाले की, तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आयुष्य घालवले. मात्र त्यांना ताकद न देता बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना पक्षात स्थान दिले जात आहे. पक्ष नेतृत्वाने कार्यकर्त्यांशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेणे सुरू ठेवल्यास आम्हाला आमचा स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आमची तयारी पूर्ण झाली असून, कोणत्याही परिस्थितीत खेड तालुक्यात युती होणार नाही; या निवडणुका आम्ही स्वबळावरच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शरद बुट्टे पाटील यांच्याशी आपला कोणताही विरोध नसल्याचे सांगत त्यांनी केवळ मुंगसे यांच्या प्रवेशालाच आपला विरोध असल्याचे नमूद केले.यावेळी त्यांनी विकास कामांतील अडथळे आणि नगर परिषद निवडणुकीतील मतदार याद्यांमधील गैरप्रकारावरही भाष्य केले. चाकण, आळंदी आणि राजगुरुनगर नगर परिषदांमध्ये बाहेरच्या मतदारांची नावे समाविष्ट केल्यामुळे विरोधक निवडून आले, असा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागूनही दबावामुळे न्याय मिळाला नसल्याचे सांगितले. सध्या खेड तालुक्यात सत्ताधारी आमदार नसल्याने निधी मिळण्यास अडचणी येत असून विकासाला खिळ बसल्याची टीकाही त्यांनी केली. मोहिते पाटील यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खेडमध्ये राजकीय भूकंप येणार? इतर पक्षाचे मोहिते पाटील विरोधक राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची मोठी चर्चा तालुक्यात आहे. तालुक्यात राजकीय भूकंप येणार अशी स्थिती असली तरी दिलीप मोहिते पाटील यांनी या चर्चेला उत्तर दिले आहे. ते कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाहीत, तर राजकारणातून बाहेर पडणार असे सांगतात.