प्रभात वृत्तसेवा चिंबळी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली परिसरातील औद्योगिक क्षेत्रातून तसेच रहदारीतून सांडपाणी व ऑईलमिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याने श्रीक्षेत्र आळंदी ते देहू या पुण्यभूमीतून वाहणारी पवित्र इंद्रायणी नदी अक्षरशः गटारगंगा बनली आहे.मोशी-चिंबळी हद्दीत इंद्रायणी नदीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या के. टी. बंधार्याजवळ पाण्याला काळपट रंग येऊन साबणासारखा फेस तयार झाला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या दूषित पाण्याचा रब्बी हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम होण्याची भीती शेतकर्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून आर्थिक नुकसान अटळ असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच या परिसरात राहणार्या ग्रामस्थांना त्वचारोग, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार यांसारख्या विविध आजारांनी हैराण केले आहे.इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नदीत सोडणार्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.