प्रभात वृत्तसेवा बेल्हे – पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांतील ग्रामीण भागासाठी वरदान ठरू शकणारा आणि अनेक वर्षांपासून रखडलेला पुणे-नाशिक रेल्वेमार्ग बदलण्यात आल्याने जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी अधिवेशनात जुन्नर तालुक्यातील जीएमआरटी प्रकल्पाचा अडसर असल्याचे कारण देत हा मार्ग बदलल्याची माहिती दिली. या मार्गाची लांबी २६४.६० किलोमीटर असून पुणे येथून सुटून हडपसर, मंजिरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरूनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबूत, साकूर, अंभोरे, संगमनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर, मोहादरी, शिंदे आणि नाशिक रोड असा प्रस्तावित मार्ग होता. या मार्गावर एकूण २४ स्थानके (१३ क्रॉसिंग आणि ११ ध्वज) प्रस्तावित करण्यात आली होती. हा रेल्वेमार्ग सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि पुणे व नाशिक येथील कामगारांना मोठा फायदा होणार होता. शेतमाल शहरात पोहोचवण्यासाठी खासगी वाहनाने जिथे सहा ते सात तास लागतात, तिथे रेल्वेने केवळ दीड ते दोन तासांत पोहोचता आले असते. तसेच, खर्चातही मोठी बचत झाली असती. मुंबई येथे नोकरीसाठी असलेल्या ग्रामीण भागातील लोकांनाही दररोज जाऊन येणे शक्य झाले असते. “पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा सतत पाठपुरावा केला असून, केंद्र सरकारने मार्ग बदलला असला तरी पुणे-नाशिक हा रेल्वेमार्ग पहिल्या ठरल्याप्रमाणे करण्यासाठी प्रयत्न करणार असून, वेळप्रसंगी आंदोलन करणार आहे.” – डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा “केंद्र शासनाने पुणे-नाशिक रेल्वे महामार्गाचा मार्ग बदलला असला तरी हा मार्ग पहिल्या ठरल्याप्रमाणेच करण्यासाठी प्रयत्न करणार असून, यासाठी राज्यशासनामार्फत पाठपुरावा करणार आहे.” – शरद सोनवणे, आमदार, जुन्नर