प्रभात वृत्तसेवा शिरूर – शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या तुटवड्यामुळे शिक्षण व्यवस्था कोलमडली असून, ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. तालुक्यात उपशिक्षकांची ८३, पदवीधर शिक्षकांची ५८ आणि मुख्याध्यापकांची ७ पदे रिक्त असल्याने एकूण १४८ शिक्षकांची पदे भरणे प्रलंबित आहे. यामुळे अनेक शाळांमध्ये अध्यापन जवळपास ठप्प झाले आहे.या गंभीर परिस्थितीमुळे रांजणगाव सांडस येथील कामाठेवाडी शाळा आणि निर्वी येथील सोनवणेवस्ती शाळा या दोन ठिकाणी एकही शिक्षक उपलब्ध नाही, त्यामुळे येथील वर्ग कागदोपत्रीच राहिले आहेत. अलीकडील बदली प्रक्रियेत जास्त पटसंख्येच्या शाळांतील शिक्षकांची कमी पटाच्या शाळांकडे बदली झाल्यामुळे जास्त विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये शिक्षक अपुरे, तर काही शाळांमध्ये वर्ग बंद पडण्याची अवस्था निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होत नाही आणि शिकण्यातील मूलभूत कौशल्ये विकसित होत नाहीत. शिक्षकांच्या अनुपस्थितीत अनेक ठिकाणी पालकांनाच मुलांचे शिक्षण बघावे लागत आहे, तर काही मुलांचे शाळेत जाणेच बंद झाले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पालक आणि ग्रामस्थांनी रिक्त पदे तातडीने भरणे, बदली प्रक्रिया शाळानिहाय गरजेनुसार करणे आणि शिक्षकविहीन शाळांना तत्काळ शिक्षक उपलब्ध करून देणे, या मागण्या शासन दरबारी जोर धरू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेचा पाया डळमळीत होत असताना प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे.