Dattatray Bharne – लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हा सर्वात प्रभावी व पवित्र मार्ग असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. शनिवारी (दि. 7) सकाळच्या सत्रात इंदापूर तालुक्यातील बोराटेवस्ती, भरणेवाडी येथील मतदान केंद्रावर त्यांनी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती, इंदापूर पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान करून नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावले. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री भरणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, लोकनेते अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने इंदापूर तालुका शोकसागरात बुडाल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, अजितदादांच्या अचानक जाण्याने संपूर्ण इंदापूर तालुक्यातील जनता दुःखात लोटली गेली आहे. या तालुक्यावर अजितदादांचे अतूट प्रेम होते आणि जनतेचेही त्यांच्यावर तितकेच प्रेम होते. हे नाते केवळ राजकीय नव्हते, तर भावनिक व विकासात्मक होते. येथील मतदार राजा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आजचे मतदान हे केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून, अजितदादांशी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऋणानुबंधांना अधिक बळकट करणारे ठरेल, असेही त्यांनी सांगितले. अजितदादा पवार दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सुविद्य पत्नी सारिका भरणे यांनी प्रचाराबाबत भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, अजितदादा पवार यांच्या निधनामुळे आम्ही कोणत्याही जाहीर सभा किंवा मोठ्या कार्यक्रमांद्वारे प्रचार केला नाही. मात्र, कार्यकर्त्यांसोबत गावोगावी व घराघरांत जाऊन मतदारांना मतदान करण्याची विनंती केली. छोट्या बैठकांतून थेट लोकांशी संवाद साधला. दुःखाच्या वातावरणातही इंदापूर तालुक्याची जनता संयम राखून लोकशाहीचा सन्मान करत असल्याचे नमूद करत त्यांनी मतदारांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने लागेल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी कृषिमंत्री भरणे यांनी राजकारणात सामाजिक जाणिवेचा ठळक संदेश दिला. त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र व पंचायत समितीचे उमेदवार श्रीराज भरणे यांनीही याच मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. “राज्याचे उपमुख्यमंत्री, लोकनेते अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक होत आहे, याचे आम्हाला मनापासून दुःख आहे. त्यांच्या भाषणशैलीची व जनतेशी असलेल्या थेट संवादाची उणीव कायम जाणवेल. मात्र, या दुःखातूनही मतदार लोकशाहीवरील आपला विश्वास व्यक्त करत मतदानाचा हक्क बजावतील. सध्या पवार कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. अशा परिस्थितीत राजकीय निर्णयांवर भाष्य करणे उचित ठरणार नाही; तेराव्यानंतर कुटुंबातील ज्येष्ठ योग्य तो निर्णय घेतील.” – दत्तात्रय भरणे, कृषिमंत्री