प्रभात वृत्तसेवा चाकण – चाकण शहरातील नागरिकांसाठी नववर्षाची सुरुवातच भीतीदायक ठरली आहे. दि. 4 जानेवारी रोजी चाकण शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तब्बल 35 लहान-मोठे नागरिक जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे अनेक कुटुंबांना नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.या गंभीर घटनेस चाकण नगरपरिषदेच्या गलथान, निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारालाच जबाबदार धरत भारतीय जनता पार्टी, चाकण मंडलच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. कुत्रा चाव्यामुळे जखमी झालेल्या सर्व नागरिकांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च संबंधित ठेकेदार व जबाबदार नगरपरिषद कर्मचार्यांकडून वसूल करण्यात यावा, अशी ठाम मागणी भाजपने केली आहे. भाजप पदाधिकार्यांनी यावेळी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, नागरिकांच्या जीविताशी खेळणार्या या निष्काळजीपणाला आता माफी नाही. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात संघर्ष करावा लागेल. या वेळी भाजप चाकण मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर, सरचिटणीस अजय जगनाडे, संदेश जाधव, प्रदेश उपाध्यक्ष शाम पुसदकर, प्रितम शिंदे, दत्ता परदेशी, योगेश देशमुख, गणपती गौडा पाटील, मंगेश देसाई, नसीम पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, चाकण शहरात वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे नगरपरिषद वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस, प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. फोटेा आहे…