प्रभात वृत्तससेवा सोमेश्वरनगर – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून सन २०२१ ते २०२४ या चार गाळप हंगामांतील एफ.आर.पी. आणि विलंबित रकमेवरील व्याज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. मात्र, या संपूर्ण यशाचे श्रेय कारखान्याच्या चेअरमनला नसून, शेतकरी कृती समितीच्या सातत्यपूर्ण लढ्याला आहे, असा थेट आरोप समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केला आहे. कायद्यानुसार ऊस तुटल्यापासून १४ दिवसांत एफ.आर.पी. देणे बंधनकारक आहे, आणि विलंब झाल्यास १५ टक्के व्याज देणे आवश्यक असते. मात्र, सोमेश्वर कारखान्याने मागील चारही हंगामांमध्ये शेतकऱ्यांना कमी आणि विलंबाने रक्कम दिल्याचा आरोप काकडे यांनी केला. शेतकरी कृती समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या याचिकेनंतर हायकोर्टाने एफ.आर.पी. एकरकमी आणि १५% व्याजासहित देण्याचे आदेश दिले.या न्यायालयीन दबावामुळेच कारखान्याने व्याज जमा केले असून, तेही पूर्ण न देता अर्धवट दिल्याचा दावा काकडे यांनी केला आहे. शेतकरी कृती समितीने उर्वरित व्याज व या प्रकरणाचा पूर्ण खुलासा व्हावा म्हणून विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी, अशी मागणी केली आहे.तसेच या सभेस अजित पवार यांसह सर्व संबंधित मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेला लढा पुढेही कायम ठेवला जाईल, अशी भूमिका शेतकरी कृती समितीने जाहीर केली आहे. काकडे यांनी कारखान्याकडे पुढील सवाल उपस्थित केले २०२४–२५ हंगामाचा अंतिम भाव २०२३–२४ पेक्षा कमी का? माळेगाव कारखान्याच्या दबावाखाली दर कमी ठेवला का? चेअरमनने १२ वर्षांत शेतकरी सभासदांच्या हितासाठी कोणते ठोस काम केले? शेतकरी प्रश्न विचारू लागले की, सभेत माईक बंद का केले जातात?