Ajit Pawar – कार्यकर्तृत्वाच्या जोरावर विकासकामांचा दादा माणूस असा ठसा उमटविलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर संपूर्ण बारामती शहर नि:शब्द झाले. हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी, दादाप्रेमींनी शहरातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. यावेळी बारामतीकरांना अश्रू अनावर झाले. शहरात सन्नाटा पसरला होता. अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाल्याचे वृत्त बारामतीकरांना समजल्यानंतर काही क्षण बारामतीकरांचा यावर विश्वासच बसत नव्हता. अजित पवार यांच्या कारकीर्दीला नियतीची दृष्ट लागली. बारामती पोरकी झाली, अशा शब्दांत बारामतीकरांनी आपल्या शोकाकुल भावना व्यक्त केल्या. अनेकांना आपले लाडके दादा आपल्यात नाहीत या अघटीत वृत्तावर विश्वास ठेवणे अवघड झाले होते. ज्या ठिकाणी विमान अपघात झाला त्या ठिकाणी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकांनी धाव घेत या माहितीची खातर जमा करण्याचा प्रयत्न केला. ही बातमी खरी असल्याचे समजल्यानंतर अनेक जण धाय मोकलून रडत होते. आपला नेता असा अचानक आपल्याला सोडून गेल्याचे दुःख कार्यकर्त्यांना पचवता येणे अवघड झाले होते.एकमेकांच्या गळ्यात पडून कार्यकर्ते हमसाहमशी रडत होते. दादा आपल्यात नाहीत ही भावना त्यांना अस्वस्थ करून सोडणारी होती. अडचण आणि संकटाच्या काळात एखाद्या मोठ्या भावासारखा खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा आपला थोरला भाऊ आपल्यातून निघून गेल्याची जाणीव बारामतीकरांना होत असल्याचे शोकाकूल वातावरण शहरात होते.मी कामाचा माणूस आहे, असे प्रत्येक भाषणांमध्ये नमूद करणारे अजित पवार हे अगदी अचानकपणे आपल्यातून निघून गेले, ही भावना बारामतीकरांच्या पचनी पडत नव्हती. तीन दशकांच्या राजकीय प्रवासात राजकीय स्थित्यंतरे व अनेक चढ- उतारांना खंबीरपणे तोंड देणारे नेतृत्व म्हणून अजित पवार यांची बारामतीकरांना ओळख होती.1991 पासून सातत्याने बारामती लोकसभा व विधानसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी नेतृत्व केले. बारामती शहर आणि तालुक्याचा कायापालट करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरून दाखविले. अजित पवार व बारामतीकर समीकरण इतके अतूट होते की, आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये देशांमध्ये किंवा राज्यामध्ये कुठलीही लाट असली तरी अजित पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी होत होते. केवळ बारामतीच नव्हे तर पुणे जिल्हा व पिंपरी- चिंचवडच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड होती. सातत्याने विकासकामांचा पाठपुरावा करण्याचे काम ते करीत होते. त्यामुळे अजित पवार यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांच्या मनात कमालीची आस्था होती. सहकार, कृषी, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय, बँकिंग आदी क्षेत्रांमध्ये अजित पवार यांनी कामाचा ठसा उमटविला होता. राज्यात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा मान देखील त्यांच्या नावे आहे. सर्वाधिक अर्थसंकल्प देखील त्यांनी सादर केले होते.अभ्यासू व कष्ट करणारा नेता म्हणून अजित पवार यांनी ओळख होती.तीन दशकांच्या राजकीय प्रवासामध्ये अजित पवार यांनी बारामतीचा सर्वांगीण विकास हे एकमेव ध्येय नजरेसमोर ठेवून वाटचाल केली. अजितदादा पवार कर्मभूमीत उतरण्यापूर्वी हिरावून नेले बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार हे बुधवार (दि.२८) बारामती तालुक्यात सभा घेणार होते. त्यासाठी ते मुंबईहून बारामतीला विमानाने निघाले होते. मात्र, बारामती विमानतळावर त्यांचे विमान अपघातग्रस्त झाल्याने त्यांचा बारामतीच्या कर्मभूमीत उतरण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा चटका सर्वांच्या मनाला लावून गेला. अजित पवार यांना असे काही होईल याची स्वप्नतही कल्पना नसलेल्या बारामतीकरांची अवस्था केविलवाणी झाली होती. अवघ्या काही मिनिटात हे वृत्त पसरल्यानंतर बारामती शहर आणि तालुका बंद ठेवण्यात आला होता. हजारो लोकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा प्रवेश झाल्यानंतर सडेतोड व परखडपणे आपली मते मांडणारा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख निर्माण झाली होती. सुरुवातीच्या काळात राजकारणात इतके परखड बोलून चालत नाही, असे म्हटले जायचे. मात्र, कालांतराने अजित पवार हे काम करतात ही बाब जेव्हा बारामतीकरांच्या लक्षात आली. त्यानंतर बारामतीकरांनी अजित पवार यांचा हा स्वभाव देखील स्वीकारला होता. ते चुकीच्या गोष्टींना समर्थन करीत नाहीत, ही बाब समोर आल्यानंतर लोकांनी अजित पवार यांना मनापासून स्वीकारले होते. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून त्यांनी कायमस्वरूपी समाजकारण व राजकारण केले.