जांबूत : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पिंपरखेड- जांबुत रोड ते आंबेवाडी अंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. याच पार्शवभूमीवर पुणे म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून ३५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे भयभीत ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडत आढळराव पाटील यांचे आभार मानले. शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील बिबटयाच्या मानवी हल्ल्यांमध्ये निष्पाप जीवांचा बळी गेल्याने या ठिकाणी पुणे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आंबेगाव-शिरूर विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी भेट देऊन कुटुंबांचे सांत्वन केले होते. यावेळी मयत रोहन बोंबेच्या भावाचा नोकरीचा विषय आपण मार्गी लावणार असल्याचे आढळराव पाटील यांनी तर शैक्षणिक खर्चाचा भार मी स्वतः उचलणार असल्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक या राज्यातील प्रमुख नेत्यांनी देखील भेटी दिल्या. यावेळी नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांपैकी पिंपरखेड-जांबुत रोड ते आंबेवाडी अंतर्गत रस्ता सुधारणा करण्याची मोठी गरज स्थानिकांनी प्रकर्षाने बोलून दाखविली. या भागात ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात असून रस्ता अतिशय खराब असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणे खूप कठीण असल्याची बाब लक्षात घेऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हा रस्ता तातडीने बनविण्यात येईल असा शब्द येथील नागरिकांना दिला. तो शब्द पूर्ण करत त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ३५.३४ लक्ष इतका निधी या रस्त्यासाठी मंजूर करून आणला आहे. याबाबत आढळराव पाटील म्हणाले की, पिंपरखेड येथील बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी गेल्याची घटना मन पिळवटून टाकणारी होती. घटना घडल्यानंतर आम्ही या भागाला भेट देऊन वनाधिकाऱ्यांना सूचना दिल्याच शिवाय येथील ग्रामस्थांनी बिबट्याचा प्रमुख वावर असलेल्या पिंपरखेड जांबुत रस्ता ते आंबेवाडी रस्ता सुधारणा करण्याची मागणी केली. हा रस्ता अतिशय अरुंद असल्याने मोटरसायकल चालविणे आणि पायी प्रवास करणे अतिशय कठीण असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. यावेळी घटनास्थळावरूनच तात्काळ येथील जिल्हा परिषदेचे उपअभियंता यांना फोन करून या कामाचे अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना दिल्या. ते प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना समक्ष भेटून या कामाची गरज व महत्त्व व समजावून सांगितले. त्यामुळे त्यांनी प्राधान्याने सर्व प्रक्रिया पूर्ण करत या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता यांना कळविले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना भेडसावणारे असुरक्षितता कमी होण्यास निश्चित मदत होईल असं मला विश्वास असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. बिबट्याची समस्या व हल्ल्यामुळे निष्पाप लोकांचे जाणारे जीव हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे कुठलाही गाजावाजा न करता मी आत्मियतेने या विषयाशी संबंधित नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी झटतो आहे व यापुढेही माझे प्रामाणिक प्रयत्न असेच चालू राहतील असे प्रतिपादन यावेळी आढळराव पाटील यांनी केले. काही लोकांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केवळ आंदोलने करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मी आणि आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी मात्र गप्प न बसता वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मंत्रालयात तात्काळ बैठकीचे आयोजन करून सुमारे 13 कोटींचा निधी मंजूर करून घेतला. सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय झाले. सुमारे २०० पिंजरे वनविभागाकरिता मागविण्यात आले. त्यापैकी बरेच पिंजरे तातडीने मागविले. बिबटे मोठ्या संख्येने पकडण्यास सुरुवात झाली. त्यांची रवानगी वनताराला करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाजीराव आढळराव पाटील, मा. खासदार शिरूर लोकसभा