प्रभात वृत्तसेवा पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजप-राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले आराेप-प्रत्याराेप सुरू आहेत. महापालिका निवडणुकीसाठी हे सुरू असून ही फक्त नुराकुस्ती आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हे आराेप सुरू आहेत. भाजपचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भ्रष्टाचाराचे आका म्हणतात, मात्र या आकांना त्यांच्याच नेत्यांनी मांडीवर घेतल्याची टीका उध्दवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरूवारी (दि.८) पत्रकार परिषदेत केली. पुनावळे – ताथवडे – वाकड, प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार (ड) आणि सागर विजय ओव्हाळ (अ) यांच्या प्रचारासाठी सुषमा अंधारे शहरात आल्या होत्या. त्यांनी पत्रकार परिषद घैत गंभीर आरोप केले. यावेळी उमेदवार जिल्हाध्यक्ष व माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, प्रभारी अशोक वाळके, रोमी संधू, रामभाऊ सपकाळ, कैलास नेवासकर, विकास पवार, सुमित निकाळजे, राहुल पवार, विजय दगडे, नितीन शिंदे, धनंजय पवार, संदीप बोरगे, हरीश सपकाळ, किरण पवार, किसन ओव्हाळ, सागर पवार, कृष्णा पवार, नरेश गराडे, निलेश पवार, किरण पवार, अक्षय भोसले, योगेश पवार, आशिष मिश्रा आदींसह प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना सांगितले की, निवडणूक आयोग भेदभाव करत आहे. आमच्या पक्षाचे मशाल हे चिन्ह प्रिंटिंग मध्ये व्यवस्थित दिसत नाही. ज्याप्रमाणे तुतारी यांनी पिपाणीचा घोळ मागील निवडणुकीत घातला होता. तसाच घोळ या निवडणुकीत निवडणूक आयोग करीत आहे. मतदारांमध्ये मशाल चिन्हाबाबत आवर्जून संभ्रम निर्माण करणे हा आयोगाचा खोडसाळपणा आहे. आम्ही निवडणूक आयोगाला उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही. याबाबत शिवसेनेने स्पष्टपणे तक्रार नोंदवली आहे. उबाठा च्या मशालीचे चिन्ह बाबत संदिग्धता निर्माण व्हावी असे काम आयोगाने केले आहे. अंधारे म्हणाल्या, पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीत निवडणूक आयाेगाचा खाेडसाळपणा समाेर आला आहे. शिवसेना पक्षाचे मशाल चिन्ह इव्हीएमवर ओळखता येत नाही. याबाबत आम्ही निवडणूक विभागाला लेखी पत्र देऊन आक्षेप नाेंदविला आहे. इव्हीएमवर मशाल चिन्ह व्यवस्थित छापण्याची मागणी केली आहे. नगरपालिकापाठाेपाठ महापालिका निवडणुकीत पैशांचा वारेमाफ वापर सुरू असून आयाेगाचे अधिकारी डाेळेझाक करत आहेत. महापालिका ही कुबेराची खाण आहे, त्यामुळे सत्तेतीमधील दाेन पक्ष भांडत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्जबाजारी झाली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची वाट लावली आहे. शहरातील प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीचे नेते आराेप-प्रत्याराेप करून नुरा कुस्ती खेळत आहेत. फडणवीसांमुळे राजकीय संस्कृतीचा ऱ्हास अंधारे म्हणाल्या, २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि राज्याच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास हाेण्यास सुरूवात झाली. फडणवीस हे मानसिकदृष्ट्या असुरक्षित असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे ते जास्त आक्रमक हाेतात, भ्रष्टाचारावर टीका करून इतर पक्षातील सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये घेऊन त्यांच्याच मांडीला माडी लावून बसायचे, हा फडणवीस यांचा ढाेंगीपणा आहे. भाजपमध्ये हाेणारे पक्ष प्रवेश ही सुज आहे. भाजप आता काॅंग्रेसयुक्त पार्टी झाली आहे. मात्र, भविष्यात भाजप फुटणार आहे. तसेच अनधिकृत व्यवसायातून पैसा आणि पैशातून सत्ता हे भाजपचे समीकरण झाले आहे. सत्तेसाठी भाजप काॅंग्रेस-एमआयएम पक्षाबराेबर गेले. त्यामुळे भाजपला प्रभू श्रीरामांचे नाव घेण्याचा अधिकारच राहिला नाही. भाजप ही गुन्हेगारांना आश्रय देणारा पक्ष झाला असून दहशतीच्या जाेरावर बिनविराेध नगरसेवक निवडून आणले जात आहे. त्यामुळे निवडणुका न घेताच नगरसेवक पदाचा लिलाव करा, अशी टीका अंधारे यांनी केली.