Pune-Mumbai Expressway – पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील गॅस वाहून नेणाऱ्या टँकरचा झालेला भीषण अपघात झाला. या अपघातात झालेल्या मोठ्या प्रमाणातील गॅस गळतीमुळे संपूर्ण महामार्ग तब्बल २४ तासांहून अधिक काळ ठप्प राहिला. या घटनेमुळे द्रुतगतीमार्ग तसेच जुना पुणे-मुंबई महामार्ग दोन्ही ठिकाणी वाहतूक कोलमडली. मंगळवारी (दि. ३) सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास प्रेपोलिन नावाचा अत्यंत ज्वलनशील गॅस घेऊन जाणारा टँकर आडोशी बोगद्याजवळून जात असताना चालकाचे न्यंत्रण सुटल्याने उवटला. या अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. गॅस अत्यंत ज्वलनशील स्वरूपाचा असल्यामुळे परिसरात मोठा धोका निर्माण झाला. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि तांत्रिक तज्ज्ञांची पथके दाखल झाली. रात्री उशिरापर्यंत गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र प्राथमिक टप्प्यात गळती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात अपयश आले. त्यामुळे बुधवारी (दि. ४) सकाळी परिस्थिती अधिक गंभीर बनली. टँकर अपघात वाहतूक ठप्प, २५ किलोमीटरपर्यंत रांगा महामार्ग बंद ठेवण्यात आल्याने द्रुतगती महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आडोशी बोगदा ते बऊर गावापर्यंत सुमारे २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. हजारो खासगी वाहने, मालवाहतूक ट्रक, प्रवासी बस आणि इतर वाहने महामार्गावर अडकून पडली. द्रुतगती महामार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक वळवण्यात आली. मात्र अचानक वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे त्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिणामी संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. प्रवाशांचे अतोनात हाल महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना तासन्तास वाहनांमध्ये थांबावे लागले. अनेक प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. काही प्रवाशांच्या विमानप्रवासाच्या वेळा चुकल्या, तर काहीजणांना नियोजित कामे पुढे ढकलावी लागली. रुग्णवाहिकांमध्ये असलेले रुग्णही वाहतूक कोंडीत अडकले होते. दीर्घकाळ वाहतूक थांबल्यामुळे काही रुग्णांच्या उपचारांवर परिणाम झाला. लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना अडचणींचा सामना करावा लागला. महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांना पिण्याचे पाणी आणि अन्य सोयींचा मोठा अभाव जाणवला. वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे वाहनांच्या इंजिनवर त्याचा परिणाम झाला. सतत चालू-बंद स्थितीमुळे अनेक वाहनांची इंजिन गरम झाली. काही वाहनांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण होऊन गाड्या रस्त्यातच बंद पडल्या. यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. बंद पडलेल्या वाहनांना बाजूला करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पथके नियुक्त केली. तरीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठा कालावधी लागला. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडी शेतकऱ्यांना आर्थिक फटका मुंबई बाजारपेठेत भाजीपाला आणि शेतीमाल घेऊन जाणाऱ्या शेकडो वाहनांचा ताफा या वाहतूक कोंडीत अडकला. अनेक वाहनांमध्ये नाशवंत माल असल्यामुळे २४ तासांहून अधिक काळ माल पडून राहिला. परिणामी भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे समोर आले आहे. प्रशासनाची युद्धपातळीवरील कारवाई अपघातग्रस्त टँकर हा अगरवाल ट्रान्सपोर्ट या कंपनीचा आहे. , बीपीसीएल, रिलायन्स ची टीम तसेच केमिकल तज्ञ धनंजय गीध हे गेल्या काही तासापासून अपघात ग्रस्त टँकर मधून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे. गॅस गळती रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित केली. रसायनतज्ञ धनंजय गीध यांच्या तज्ञांच्या देखरेखीखाली टँकरमधील गॅस सुरक्षित पद्धतीने दुसऱ्या टँकरमध्ये भरून काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बुधवारी दुपारी सुमारे ४:३० वाजता गॅस हस्तांतरणाचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. गॅस गळतीमुळे स्फोटाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी परिसरात विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. खाकीतील माणुसकीचे दर्शन या संकटकाळात लोणावळा शहर पोलिसांनी अडकलेल्या प्रवाशांना मदत पुरवण्यासाठी पुढाकार घेतला. पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे आणि त्यांच्या पथकाने महामार्गावर अडकलेल्या लहान मुले, वृद्ध नागरिक आणि इतर प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि फळांची व्यवस्था केली. या मदत कार्यात लोणावळा-खंडाळा टॅक्सी असोसिएशनच्या सदस्यांनीही सहभाग घेतला. त्यांनीही प्रवाशांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. महामार्गावर मदत पथकांनी सतत फिरून अडकलेल्या नागरिकांना सहाय्य केले.