प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शहरात लोकशाहीचा कणा मानल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेची अक्षरशः फरफट झाल्याचे चित्र समोर आले. मतदानाच्या दिवशी सुरू झालेला प्रशासकीय गोंधळाने मतमोजणीच्या दिवशी कळस गाठला. अर्ज सादर केलेल्यांच्या आकडेवारीपासून घोळाची सुरू झालेली परंपरा शेवटच्या दिवशी मत मोजणीच्या फेऱ्यांपर्यंत अविरत सुरू राहिली. परिणामी, ही निवडणूक आहे की थट्टा, असा संतप्त सवाल शहरभरातील नागरिकांनी उपस्थित केला. मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडणे, वारंवार अडकणे, तर काही ठिकाणी चुकीची माहिती दाखवणे अशा तक्रारींचा पाऊस पडला. तासन्तास रांगेत उभे असलेले मतदार हताशपणे परतताना दिसले. काही केंद्रांवर तर मतदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. या पार्श्वभूमीवर किमान मतमोजणी तरी सुरळीत होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपेक्षाही प्रशासनाने धुळीस मिळवली. मतमोजणी सुरू असतानाच अचानक संपूर्ण शहरातील प्रणाली कोलमडली. सर्व्हर डाऊन झाले, स्क्रीन गोठल्या आणि चालू निकाल थांबवण्यात आले. काही वेळानंतर जे आकडे पुन्हा दाखवले गेले होते, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. अनेक प्रभागांमध्ये आधी दाखवलेली आघाडी गायब झाली आणि सुरुवातीचेच आकडे पुन्हा झळकू लागले. या प्रकारामुळे उमेदवार, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला. आकडे पुढे-मागे कसे जातात, प्रणाली कोसळण्यामागे नेमके कारण काय, असे गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. औद्योगिक, आयटी आणि स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये जर निवडणूक यंत्रणा इतकी अपयशी ठरत असेल, तर हे केवळ तांत्रिक बिघाड म्हणून झटकून टाकता येणार नाही. ही लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारी बाब असल्याचे मत मतदारांनी मांडले. कोट्यवधींचा खर्च पण यंत्रणा फेल महापालिका निवडणुकीच्या कामाकाजासाठी महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. स्मार्ट यंत्रणेसाठी कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली. मात्र असे असतानाही महापालिका निवडणुकीत माहिती वेळेत देणे, गोंधळाविना निवडणूक पार पाडण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे.