प्रभात वृत्तसेवा पिंपरी – यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २६ मध्ये सर्वच उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर प्रचाराची आणि पैशांचीही ताकद लावलेली दिसत आहे. त्यामुळे ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली असल्याचे मत आम आदमी पक्षाचे उमेदवार रविराज काळे यांनी प्रचारा दरम्यान व्यक्त केले.पिंपळेनिलख, विशाल नगर आणि कस्पटे वस्ती या परिसरातील नागरिकांचे स्पष्ट मत आहे की, आम्हाला दिखाऊ प्रचार नको, आम्हाला काम करणारे आणि दूरदृष्टी असणारे नेतृत्व हवे आहे. या प्रभागात असे नेतृत्व आधीपासूनच नागरिकांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरलेले आहे ते म्हणजे काळे रविराज बबन. ज्यांनी विकासाला केवळ घोषणांपुरते मर्यादित न ठेवता विकासरूपी व्हिजन आणि दूरदृष्टीने प्रत्यक्षात उतरवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, नागरी सुविधा आणि नागरिकांच्या समस्या या प्रत्येक बाबतीत त्यांच्या कामातून विश्वास निर्माण झाला आहे. यंदाची निवडणूक ही केवळ उमेदवार निवडण्यापुरती मर्यादित नसून, प्रभाग क्रमांक २६ मध्ये कोणत्या विचारांची, कोणत्या मूल्यांची आणि कोणत्या प्रकारच्या राजकारणाची गरज आहे याचा निर्णय घेण्याची ही संधी आहे. यंदा प्रभाग क्रमांक २६ मध्ये धनशक्तीपेक्षा जनशक्तीचा विजय होणार, अशी खात्री नागरिकांच्या बोलण्यातून आणि भूमिकेतून जाणवत असल्याचे काळे म्हणाले.