Maval Election – मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ व पंचायत समितीच्या १० जागांसाठी आज मतदान होणार आहे. एकूण १५ जागांसाठी ४० उमेदवारांचे भवितव्य सुमारे दोन लाख मतदार मतदान यंत्रांमध्ये बंद करणार आहेत.भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत यंदा पहावयास मिळत आहे. तालुक्यात टाकवे बु.- नाणे, इंदोरी- वराळे, खडकाळा- कार्ला, कुसगाव बु.- काले व सोमाटणे- चांदखेड हे जिल्हा परिषदेचे पाच गट आहेत. तर टाकवे बु., नाणे, इंदोरी, बराळे, खडकाळा, कार्ला, कुसगाव बु., काले, सोमाटणे, चांदखेड हे पंचायत समितीचे दहा गण असून जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी १३ उमेदवार तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत. अजितदादांच्या निधनाने राष्ट्रवादीसह कोणत्याही पक्षाने मोठ्या सभा, रॅली काढल्या नाहीत. फटाके, ढोल-ताशा असे काहीच पहायला मिळाले नाही. यामुळे अखेरच्या दिवशी जाहीर प्रचार करता येत नसल्याने व्यक्ितगत भेटी-गाठी, आश्वासने आणि प्रलोभनांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे.या आधी झालेली वडगाव नगरपंचायत, लोणावळा व तळेगाव नगरपरिषद निवडणूकही पैशावरच झालेली पाहायला मिळाली. त्यात वडगाव नगरपंचायत निवडणुकीतील पर्चेस व्होटिंग चा फंडा चांगलाच गाजला. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत हाच फंडा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषद पुणे अलिकडेच झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत झालेली पैशांची उधळपट्टी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही पहावयास मिळाली नसली तरी कार्यकत्र्यांवर आणि मतदारांवर उमेदवारांनी मन मोठे करुन खर्च केल्याच्या चर्चा आहेत. तरी मतदार राजा कोणाला कौल देणार हे मतमोजणीच्या दिवशीच ठरणार आहे. प्रशासनही सज्ज तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीचे १० गण अशा एकूण १५ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी तालुक्यात २४३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मावळ तालुक्यात एकूण २,००,३१६ मतदार आहेत. यामध्ये १,०२,०८२ पुरुष मतदार, ९८,२२६ महिला मतदार आणि आठ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषदच्या गटामध्ये सोमाटणे गटात सर्वाधिक ४५,७७५ इतके मतदार आहेत. तर सर्वांत कमी मतदार इंदुरी गटात ३६,२८० इतके आहेत. पंचायत समितीच्या गणांमध्ये सर्वाधिक मतदार काले गणात असून २४,१९९ इतकी मतदार संख्या आहे. तर सर्वांत कमी मतदार इंदुरी गणात १६,४९९ इतकी आहे. मतदान शनिवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडणार आहे. त्यानंतर सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी) मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासस सज्ज असून मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.