Mawal Election – मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराचा काल (दि. ५) अखेरचा दिवस ठरला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील राजकीय वातावरण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीचे दहा गण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत राजकीय हालचालींनी वेग घेतला होता. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विविध पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असून आता सर्व उमेदवारांचे लक्ष मतदारांच्या निर्णयाकडे लागले आहे.मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक-नाणे, इंदुरी-वराळे, खडकाळा-कार्ला, काले-कुसगाव बुद्रुक आणि सोमाटणे-चांदखेड या जिल्हा परिषद गटांमध्ये यंदा राजकीय चुरस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या प्रत्येक गणामध्येही स्थानिक पातळीवर तीव्र राजकीय संघर्ष रंगला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न सुरू ठेवले.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांची मित्रपक्षीय आघाडी आणि भाजप-शिवसेना महायुती यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. या राजकीय लढतीत पक्षीय ताकदीबरोबरच स्थानिक नेतृत्व, संघटन कौशल्य आणि मतदारांशी असलेला थेट संपर्क यालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रचारादरम्यान विविध गावांमध्ये बैठका, जेवणावळी आणि मतदारांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रचारातील खर्च, आश्वासने आणि निवडणूक व्यवस्थापन यावरूनही राजकीय चर्चांना उधाण आले. पुणे जिल्हा परिषद निवडणूक मतदारांमध्ये लोकप्रतिनिधी निवडताना कामगिरी, विश्वासार्हता आणि जनसंपर्क यांना प्राधान्य द्यावे की पक्षीय ताकदीला महत्त्व द्यावे, याबाबत चर्चा रंगताना दिसली.मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल हा स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा मानला जात आहे. मतदारांचा कौल हा तालुक्याच्या अपेक्षा, समस्या आणि भविष्यातील विकासाच्या वाटचालीचे प्रतिबिंब असणार आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून मतदानाच्या दिवशी उमटणारा निर्णय हा तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक भवितव्याचा मार्ग ठरवणारा ठरणार आहे अजितदादांच्या निधनामुळे प्रचाराला अनपेक्षित वळण या निवडणुकीवर प्रभाव टाकणारी महत्त्वाची घटना म्हणजे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनाची घटना ठरली. त्यांच्या निधनानंतर मावळ तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोकभावना पसरली होती. विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या कलशयात्रा, श्रद्धांजली सभा आणि स्मरण कार्यक्रमांमुळे प्रचाराला अनपेक्षित भावनिक वळण मिळाले. प्रचारसभांमध्ये विकासकामांबरोबरच भावनिक विषयही चर्चेत राहिले. या भावनिक वातावरणाचा मतदारांच्या निर्णयावर किती परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारांची भुमिका निर्णायक तालुक्यातील मतदार शांतपणे सर्व घडामोडींचे निरीक्षण करत असल्याचे चित्र आहे. प्रचारातील आश्वासने, कामगिरी आणि उमेदवारांची भूमिका यांचा विचार करून मतदार निर्णय घेणार असल्याचे वातावरण दिसत आहे. मतदानाच्या दिवशी उमटणारा कौल हा केवळ राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा नसून मावळ तालुक्याच्या भविष्यासाठीही निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीतून निवडून येणारे लोकप्रतिनिधी तालुक्यातील विकास, पायाभूत सुविधा आणि सामाजिक प्रश्नांवर कोणती दिशा ठरवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.