Lonavala Tourism – शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार अशी सलग तीन दिवसांची सुट्टी मिळाल्याने मावळ तालुका पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेला आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे तसेच उपनगरांतील हजारो पर्यटकांनी या सुट्ट्यांचा लाभ घेत मावळातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी आपली पावले वळवली आहेत. लोणावळा, खंडाळा, पवना धरण परिसर, कार्ला-भाजे लेणी, लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग, राजमाची, भुशी धरण, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट यांसारख्या सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे.शनिवारी (दि. २४) पहाटेपासूनच मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग आणि जुना महामार्गावर पर्यटकांच्या वाहनांची गर्दी वाढू लागली. अनेक पर्यटकांनी गर्दी टाळण्यासाठी पहाटेच प्रवास सुरू केला, तरीही सकाळ होताच मावळाच्या प्रवेशद्वारांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. लोणावळा शहरात प्रवेश करताना तसेच पवना रोड, भुशी धरण मार्ग, टायगर पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली. पर्यटकांची संख्या इतकी होती की, अनेकांना वाहन रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत लावावी लागली. वाहतूक पोलीस, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवक गर्दी नियंत्रणासाठी दिवसभर प्रयत्न करत आहेत.सलग सुट्ट्यांचा अंदाज घेऊन अनेक पर्यटकांनी आठवडाभर आधीच हॉटेल आणि रिसॉर्टचे आरक्षण केले होते. पवना डॅम त्यामुळे लोणावळा-खंडाळा परिसरातील हॉटेल, रिसॉर्ट, लॉज, होमस्टे जवळपास पूर्णतः भरले. काही पर्यटकांनी ऐनवेळी खोली मिळत नसल्याने तळेगाव, वडगाव, मावळातील ग्रामीण भागात मुक्कामाची व्यवस्था केली. पवना धरण परिसरातील कॅम्पिंग साइट्स, फार्महाऊस, रिसॉर्ट याठिकाणीही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत पर्यटकांचे आगमन सुरू होते, त्यामुळे परिसरात उत्सवी आणि गजबजलेले वातावरण निर्माण झाले होते. सलग सुट्ट्यांमुळे मावळ तालुका पुन्हा एकदा पर्यटकांच्या पसंतीचा केंद्रबिंदू ठरला आहे. निसर्गसौंदर्यामुळे हजारो पर्यटक येथे दाखल झाले, त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. मात्र त्याचबरोबर पर्यावरण, वाहतूक आणि प्रशासनासमोर आव्हानेही उभी राहिली आहेत. योग्य नियोजन, शिस्त आणि सहकार्य असल्यास पर्यटन आणि स्थानिक जीवन यांचा समतोल राखता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना पर्यटकांच्या गर्दीचा सर्वाधिक फायदा स्थानिक व्यावसायिकांना होत आहे. हॉटेल, ढाबे, खाद्यपदार्थ विक्रेते, फळ विक्रेते, टॅक्सी चालक, रिक्षाचालक, पर्यटन मार्गदर्शक, कॅम्पिंग व्यवस्थापक, स्थानिक दुकानदार यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर ग्राहक आले आहेत. अनेक व्यावसायिकांसाठी हे तीन दिवस म्हणजे वर्षातील सर्वाधिक उलाढाल होत आहे. लोणावळ्यातील चिकी विक्री,पवना परिसरातील कॅम्पिंग व्यवसाय, तसेच पर्यटनाशी संबंधित सेवा पुरवणाऱ्या युवकांना अतिरिक्त रोजगार मिळाला आहे. निसर्गसौंदर्याचा पर्यावरणाला फटका मावळातील हिरवीगार डोंगररांग, थंड हवामान, धुके, धरणे, किल्ले आणि घाटरस्ते यामुळे पर्यटक आकर्षित होत असले तरी, वाढलेल्या गर्दीमुळे पर्यावरणावर ताण जाणवत आहे. काही ठिकाणी प्लास्टिक कचरा, बाटल्या, अन्नपदार्थांचे अवशेष रस्त्याच्या कडेला पडलेले दिसून आले. भुशी धरण, टायगर पॉइंट, पवना परिसरात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून, स्थानिक प्रशासनाला अतिरिक्त स्वच्छता मोहिमा राबवाव्या लागत आहेत.