प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेत एकेकाळी सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने यंदा १२८ जागांपैकी केवळ ५८ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पक्षाला एकूण ३२ पैकी सहा प्रभागांमध्ये एकही उमेदवार देता आलेला नाही, तर केवळ चार प्रभागांमध्ये पूर्ण पॅनेल उभे करता आले आहे. काँग्रेस ‘एकला चलो रे’ म्हणत स्वबळ अजमावत आहे. २०१७ मधील निवडणुकीत पक्षाला एकही जागा निवडून आणता आली नव्हती. यंदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर पक्षात अंतर्गत वाद झाले. यातून कैलास कदम यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे उमेदवार निश्चित करण्यापासून ते एबी फाॅर्म वाटप करण्यापर्यंत मोठी कसरत करावी लागली. एन निवडणुकीच्या तोंडावर कैलास कदम यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षातील कार्यकर्ते सैरभैर झाले. पक्षातील गोंधळ पाहून इच्छुकांनी पक्षाकडे पाठ फिरवली. परिणामी ३२ प्रभागांमधील १२८ जागांसाठी उमेदवार मिळाले नाहीत. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवारांची शोधाशोध सुरू होती. यात केवळ ५८ जागांसाठी उमेदवार मिळाले.काँग्रेसतर्फे १, २, ३, ४, ५, ६, १४, १८, २८, ३१ आणि ३२ या प्रभागांमधून प्रत्येकी केवळ एक, प्रभाग १० आणि २३ मधून प्रत्येकी दोन, प्रभाग ८, १२, १३, १५, १९, २०, २२, २५ आणि ३० या नऊ प्रभागांमधून प्रत्येकी तीन, तर प्रभाग ९, ११, १६ आणि १७ या चार प्रभागांमधून प्रत्येकी चार असे उमेदवार उभे आहेत. या प्रभागांत उमेदवार नाही. शहरातील ७, १८, २१, २४, २६ आणि २९ या सहा प्रभागांमध्ये एकही उमेदवार पक्षाला मिळाला नाही. १२८ पैकी निम्म्या जागांवरही उमेदवार देता आलेले नाहीत. गोंधळाला कंटाळून उमेदवारी मागे काँग्रेसला उमेदवारांची शोधाशोध करावी लागत असतानाच समन्वयाअभावी मोठा गोंधळ उडाला. चार ते पाच जागांसाठी दोन-दोन ‘एबी फाॅर्म’ देण्यात आले. यातून उमेदवारांनी समन्वय समितीवर आगपाखड केली. या गोंधळाला कंटाळून काहींनी नाराजी व्यक्त करत उमेदवारी मागे घेतली. निष्ठावंतांना डावलण्यासाठी दोन ‘एबी फाॅर्म’ देण्यात आल्याचाही आरोप झाला.