प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिकेतील भ्रष्टाचार पाहिल्यानंतर मला पश्चाताप होतो. याच्याकडे काय होत पूर्वी, जकातनाक्यावर भंगाराच्या गाड्या इकडच्या तिकड करायचा आज किती प्रॉपर्टी झाली? शहराची वाट लावली. बकालपणा करून वाटोळे केले. हे करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा. आता सत्ता बदलली, तरच बरे दिवस आहेत. अन्यथा पुढील काळात वाचविण्यासाठी कोणी येणार नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि. १३) केली.प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोसरी, दापोडी येथे प्रचार सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. या निवडणुकीत सुरुवातीपासून अजित पवार व आमदार महेश लांडगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शेवटच्या सभेतही पवारांनी आमदार लांडगेंवर नाव न घेता पुन्हा टीकास्त्र सोडले. काय होतास तू काय झालास तू? असे म्हणत आमदाराला मी नगरसेवक, स्थायी समितीचे अध्यक्ष केले. नगरसेवक होण्याच्या अगोदर भंगारच्या गाड्या इकडून तिकडे पोहचवत होता. भोसरीची युपी बिहारसारखी परिस्थिती झाली. आकाच्या धमक्या येतात, अशी टीका त्यांनी केली. तसेच, भोसरीत सभेला परवानगी मिळू देऊ नये. यासाठी पोलिसांना दम दिला जातो. पहाटे पाच वाजता आपल्या सभेला परवानगी मिळाली. हा काय प्रकार आहे, असा आरोपही पवारांनी केला.अजित पवार पुढे म्हणाले, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना २५ वर्षात माझ्यावर एक रुपयाचाही आरोप कोणी करु शकले नाही. शहर कर्मभूमी समजून विकास कामे केली. महापालिका आर्थिक मजबूत केली. आज ठेवी मोडल्या, महापालिका कर्जबाजारी केली. नागरिकांना दररोज पाणी मिळत नाही. विकास आराखड्यातील रस्ते विकसित केले नाहीत. झोपडपट्या नसताना टीडीआर लाटून कोट्यवधी रुपये कमविले जातात. भोसरी पुलाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले. पण, काम नाही. त्यांना खड्यासारखे बाजूला करावे.दम देत असून दहशत माजवत आहेत. विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या दूरचित्रवाहिनीत (टीव्ही) भ्रष्टाचार केला आहे. नऊ वर्षात ४० हजार कोटींची कोणती कामे केली ती दाखवावी. कुठे पाणी मुरले? कोणाच्या मालमत्ता वाढल्या? कोणी नातेवाईकांच्या नावाने जमिनी घेतल्या? शितलबाग येथील ७० लाखांचा पादचारी उड्डाणपूल सात कोटींवर कोणी नेला? बारा कोटीचे सॉफ्टवेअर १२० कोटी रुपयांवर कोणी नेले? असा प्रश्नांची सरबत्ती करून त्याची उत्तरे देण्याचे आव्हान पवार यांनी दिले. मी सहा वेळा मुख्यमंत्री… भोसरीतील सभेत बोलताना माझ्या काकांच्या पुण्याईने चांगले सुरु असून सहावेळा मुख्यमंत्री झालो, असे अजित पवार म्हणाले. परंतु, चूक लक्षात येताच उपमुख्यमंत्री झालो, असे म्हणत चुकून मुख्यमंत्री शब्द आला. पण, होतच नाही तर काय करु… अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली.