Shocking Incident – निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना पवनानगर परिसरात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेगावचे माजी सरपंच अशोक राजिवडे यांचा फोटो लिंबू-मिरची लावून रस्त्यावर टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. लोकशाही प्रक्रियेला तडा देणारा आणि मतदारांमध्ये गैरसमज पसरवणारा हा प्रकार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.अशोक राजिवडे हे कुसगाव-काले जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारून दुसऱ्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उमेदवारी नाकारल्यानंतरही राजिवडे यांनी नाराजी न दाखवता पक्षाचा आदेश मान्य करत संबंधित उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला. अशा परिस्थितीत त्यांचा फोटो अघोरी पद्धतीने रस्त्यावर टाकण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.सोमवारी (दि. २) सकाळच्या सुमारास नागरिकांच्या नजरेस हा प्रकार पडला. रस्त्यावर राजिवडे यांचा फोटो ठेवून त्यावर लिंबू, मिरची आणि कुंकू टाकण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी किंवा विरोधकांचे नुकसान व्हावे या अंधविश्वासातून अशा प्रकारच्या कृत्यांचा अवलंब केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. घटनेनंतर सोशल मीडिया या प्रकाराचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे समर्थक आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे. लोकशाही प्रक्रियेत अंधश्रद्धेला स्थान नसून मतदारांनीही अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करून विवेकबुद्धीने मतदान करावे, असे मत विविध स्तरातून व्यक्त केले जात आहे. निवडणुका म्हणजे विकास आणि जनतेच्या हिताचे धोरण निवडण्याची संधी असते. त्यामुळे अशा अघोरी प्रकारांना समाजात थारा मिळू नये, अशी भावना परिसरात व्यक्त होत आहे.