Railway Accident – पुणे- मिरज रेल्वे मार्गावरील जेऊर फाटा (ता. पुरंदर) परिसरात मंगळवारी (दि. २७) घडलेल्या रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या (दि.२२) रोजी तरूणाचा विवाह होणार होता. संपूर्ण कुटुंब घरात लग्नाची तयारी करीत असताना कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. प्रथमेश कुंडलिक तांबे (वय २५, रा.जेऊर), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. जेऊर फाट्याजवळ रेल्वेमार्गावर अपघात झाल्याची माहिती नागरिकांना मिळाली. जेऊर येथील माजी उपसरपंच ज्ञानेश्वर धुमाळ यांनी माजी पोलीस पाटील कुंडलिक तांबे यांना त्यांच्या पुतण्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दिली. घटनास्थळी पाहणी केली असता प्रथमेश याचा मृतदेह आढळून आला. तत्काळ नीरा पोलिस दुरक्षेत्राला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच नीरा पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार संदीप मदने, घनशाम चव्हाण व सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. जेजुरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी उशिरा शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद नीरा पोलिस दूरक्षेत्रात केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.प्रथमेश तांबे हा उच्चशिक्षित असून त्याने एम. एस्सी. पदवी प्राप्त केली होती. तो लोणंद येथील औद्योगिक वसाहतीमधील एका खासगी कंपनीत नुकताच कायमस्वरूपी नोकरीस लागला होता. नोकरी पक्की झाल्यानंतर त्याचे लग्न ठरले होते. फेब्रुवारी महिन्याच्या २२ तारखेला विवाह असल्याने घरात लग्नाची तयारी सुरू होती. सोमवारी (दि.२६) रात्रपाळी करून तो मंगळवारी (दि.२७) सकाळी घरी आला होता. चहा पिऊन मित्राकडे जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडलेला प्रथमेश परत आलाच नाही. त्याऐवजी त्याच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांवर कोसळली. लग्नाच्या तयारीत असलेल्या घरावर अचानक काळाने घाला घातल्याने जेऊर गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रथमेशच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आहेत. ही घटना केवळ कुटुंबापुरती मर्यादित न राहता, तरुणांच्या सुरक्षा आणि रेल्वे मार्गावरील दक्षतेचा संदेश देणारी ठरली असल्याचे सोमेश्वरचे संचालक अनंता तांबे यांनी सांगितले. बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाचा घाला लग्नाच्या तयारीत असलेल्या घरावर अचानक काळाचा डोंगर कोसळला. हातावर मेहंदी, डोळ्यांत स्वप्ने, मनात आनंद सर्व काही क्षणात विस्कटल्यासारखे झाले.काही दिवसांत लग्नाच्या बोहल्यावर चढायचा होता,पण आज त्या घरात शोक पसरला आहे. प्रथमेशच्या जाण्याने संपूर्ण गाव हळहळले.