प्रभात वृत्तसेवा बारामती – सासरकडील शेतजमीन मिळविण्याच्या उद्देशाने कट रचून सासरा आणि मेहुणीचा खून केल्याप्रकरणी बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी जावयासह तिघांना जन्मठेप तसेच प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विशाल सोपान वत्रे (रा. मसनरवाडी, ता. दौंड), जयदीप जयराम चव्हाण (रा. येडेवाडी, लिंगाळी, ता. दौंड) आणि केरबा नारायण मेरगळ (रा. मेरगळमळा, मसनरवाडी, ता. दौंड), अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. रमेश तुकाराम बाराते आणि त्यांची मुलगी शीतल रमेश बाराते यांची हत्या केली होती. आरोपी वत्रे याचे रमेश बाराते हे सासरे, तर शीतल ही मेहुणी होती. रमेश बाराते यांना दोन मुली असून, थोरल्या मुलीचा विवाह आरोपी वत्रे याच्याशी झाला होता. मात्र, वत्रे याला धाकटी मेहुणी शीतल हिच्याशी विवाह करायचा होता. बाबुर्डी येथील १६ एकर शेतजमीन एकट्यालाच मिळावी, असा त्याचा हेतू होता. मात्र, रमेश बाराते आणि शीतल यांनी त्यास विरोध केला होता.या रागातून (दि.२२) मार्च २०१६ रोजी विशाल वत्रे याने रमेश बाराते व शीतल यांना जेवणाच्या निमित्ताने घरी बोलावले. जयदीप चव्हाण आणि केरबा मेरगळ यांना सुपारी देऊन दोघांचा खून करण्याचा कट रचला. आरोपींनी रेकी करून रमेश बाराते आणि शीतल मोटारसायकलवरून घरी जाताना हिंगणगाडा शिवारात त्यांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकली. चव्हाण याने दगडाने, तर मेरगळ याने कोयत्याने वार करून दोघांचा जागीच खून केला. याप्रकरणी रमेश बाराते यांचे पुतणे अमोल जयराम बाराते यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी तपास करून आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकार पक्षाकडून २० साक्षीदार तपासले. तपासी अधिकारी आणि इतर साक्षीदारांचे जबाब, सरकारी वकील ॲड. स्नेहल नाईक यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेप, प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात पैरवी अधिकारी गोरख कसपटे, अंमलदार विठ्ठल वारगड व वेनुनाद ढोपरे यांनी कामगिरी बजावली.