अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात अवैध वाळू तस्करीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कायद्यानुसार भंगारात नोंदवलेली वाहने रस्त्यावर वापरणे हा अक्षम्य गुन्हा असतानाही, महसूल, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या कथित संरक्षणाखाली अशा अनफिट आणि भंगार वाहनांतून वाळूची राजरोस वाहतूक सुरू आहे. यामुळे वारंवार अपघात होत असून, नुकताच भानसहिवरे (ता. नेवासे) येथे घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप इसमाचा बळी गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. अपघाताची संपूर्ण हकीकत शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ८:४५ वाजता नेवासे-शेवगांव राज्य महामार्गावर भानसहिवरे शिवारात दुध डेअरीजजवळ एका भरधाव वेगातील डंपरने रस्त्याच्या विरोधी बाजूला उभ्या असलेल्या राजेंद्र गंगाधर भोईटे (वय ५२, रा. भानसहिवरे) यांना जोरदार धडक दिली. या अपघातात भोईटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पुढे जाऊन डंपर पलटी झाला. त्यानंतर वाळूतस्करांनी जेसीबीच्या साह्याने डंपर सरळ केला आणि ते अपघातग्रस्त ठिकाणाहून पुन्हा पसार झाले. या दरम्यान जखमी भोईटे रस्त्यावर तडफडत असताना, त्यांना मदत करण्यापेक्षा भंगार डंपर काढून नेण्याचा प्रयत्न वाळूतस्करांकडून करण्यात आल्याचा आरोप आहे. अवैध वाळू तस्करी आणि भंगार वाहनांचा वापर परिसरातील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, नेवासे तालुक्यात भंगारातील (स्क्रॅप) वाहने वाळू तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. हे वाहने कायद्यानुसार रस्त्यावर आणता येत नाहीत, तरीही महसूल, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दरमहाच्या ‘सलामी’ (लाच) घेऊन कारवाई टाळली जाते. कायद्यानुसार, अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा परवाना जागेवरच रद्द किंवा निलंबित करण्याची तरतूद आहे. पण अपघात होऊनही प्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करतो. भंगार वाहनांचे मालकच नसतात, अपघात झाल्यास वाळूतस्कर “वाहन आमचे नाही” असे सांगून जबाबदारी झटकतात. पकडले गेले तरी वाहने पुन्हा भंगारात जाऊन काही दिवसांतच रस्त्यावर येतात. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे थेट तक्रार या अपघातानंतर आणि अवैध वाळू तस्करीच्या पार्श्वभूमीवर, संबंधितांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात थेट तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत महसूल, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कारनाम्याची कुंडली उघड करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे प्रशासन आणि वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहेत. आता प्रश्न असा आहे की, भंगार वाहनांवर आणि अवैध वाळू तस्करीवर प्रशासन कठोर कारवाई करणार का? निष्पाप जीव गेले असताना हे दुर्लक्ष किती काळ चालू राहणार? याकडे सर्वसामान्य जनतेचे आणि परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.