सातारा -जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्ह्यातील करोना उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका यांचे योगदान विसरता येणार नाही. करोना उपाययोजनात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आघाडीवर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातील विविध विभाग एकत्रित प्रयत्न करत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका यांनी सुट्ट्या न घेता दिलेले योगदान कोणीही विसरु शकणार नाही.
जिवावर उदार होऊन आरोग्य विभाग काम करत असल्यामुळे जिल्हा परिषद करोना उपाययोजना करण्यात कमी पडत आहे हे म्हणणे चुकीचे आहे. पदाधिकारी व अधिकारी करोना उपाययोजनांत रात्रंदिवस कष्ट घेत आहेत. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागात पाच लाख नागरिकांना “अर्सेनिक अल्बम 30′ या गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन विधाते यांनी केले.
सध्या जबाबदारी मांढरेंकडे
सुनील चतुर यांनी जिल्हा परिषदेत चांगले काम केले होते. ते हुशार आणि अनुभवी असल्यामुळे त्यांना खासगी स्वीय सहाय्यक म्हणून पुन्हा संधी दिली होती. मात्र, या नियुक्तीवरुन अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. खासगी स्वीय सहाय्यकांना कार्यालयातील यंत्रणा वापरता येणार नाही. चतुर यांनी लावलेल्या त्यांच्या नावाच्या पाटीवरुनही वाद झाला. परिणामी ही पाटी काढून टाकण्यात आली आहे. सध्या युवराज मांढरे हेच स्वीय सहाय्यकाची जबाबदारी सांभाळत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.