प्रभात वृत्तसेवा बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा विवाह तनिष्का यांच्याशी नुकताच मुंबई येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. विवाहानंतर बारामती येथे झालेल्या भव्य स्वागत समारंभातून केवळ आनंदोत्सवच नव्हे तर एक सकारात्मक सामाजिक संदेशही देण्यात आला. बारामती शहर, तालुका तसेच जिल्ह्यातील विविध भागांतून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. युगेंद्र पवार यांनी एक सामाजिक बांधिलकीचा संदेश देत राजकीय धागा गुंफला आहे.पवार कुटुंबीयांनी विवाहानिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपत एक स्तुत्य उपक्रम राबवल्याची चर्चा होत आहे. बारामती शहरातील विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या बालकल्याण केंद्र संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी शरयू फाउंडेशनच्या वतीने स्नेहभोजनाचे आयोजन केले. कार्यक्रमात फाउंडेशनच्या अध्यक्षा व युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार, युवा नेते युगेंद्र पवार, पत्नी तनिष्का पवार यांनी स्वतः विद्यार्थ्यांना प्रेमाने भोजन वाढले. राजकारणात केवळ सत्ताकारण नव्हे, तर समाजातील दुर्बल घटकांशी नाते जपणे हीच खरी लोकनेतृत्वाची ओळख असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. आगामी काळात युवकांमध्ये नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारताना सामाजिक संवेदनशीलता किती महत्त्वाची आहे, हे युगेंद्र पवार यांच्या कृतीतून अधोरेखित झाले आहे. स्नेहभोजनामुळे विद्यार्थी भारावले बालकल्याण केंद्रातील विद्यार्थी या स्नेहभोजनामुळे भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनाही समाधान वाटत होते. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही नवदाम्पत्याला अनोख्या शब्दांत शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केले. विशेष मुलांसाठी सुग्रास जेवणाची मेजवानी त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरली. वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगी समाजहिताला प्राधान्य देणारी ही भूमिका पवार कुटुंबाच्या राजकीय संस्कृतीची परंपरा पुढे नेणारी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. यातून बारामतीत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, युगेंद्र पवार यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस बळ मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.