प्रभात वृत्तसेवा पुणे – पूर्ववैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी दहा जणांच्या टोळक्याविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अभिजित अवचरे (२९, रा. कात्रज गाव) असे मृताचे नाव आहे. ही घटना २९ जुलै रोजी घडली होती. उपचारादरम्यान अभिजितचा मृत्यू झाला. याप्रकरणी ओंकार राजेंद्र दानवले ( १९, रा. ओव्हाळ वाडा, कात्रज गाव) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार सोहम धुमाळ, संकेत रेणुसे, नवीन गागधरी आणि पृथ्वीराज पवार यांना अटक करण्यात आली आहे. तर सात अल्पवयीन मुले ताब्यात घेण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दानवले याची धुमाळ, रेणुसे यांच्याशी भांडणे झाली होती. तर २९ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दानवले आणि त्याचा मित्र अवचरे दुचाकीवरून कात्रजमधील जैन मंदिराजवळून निघाले होता.त्या वेळी आरोपी धुमाळ, रेणुसे यांच्यासह साथीदारांनी दुचाकीस्वार दानवले आणि मित्राला अडवून शिवीगाळ केली. टोळक्याने दोघांना मारहाण केली, तसेच दानवलेबरोबर असलेल्या मित्र अभिजितच्या डोक्यात तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत अभिजित गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर करीत आहेत.