पुणे-आपले नाव मतदार यादीत असणे व मतदान करणे हा सुद्धा देश सेवेचाच एक भाग आहे. भारतीय संविधानाने 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक सज्ञान नागरिकाला मताधिकार बहाल केलेला आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या मताला समान महत्त्व असल्याने मताधिकार ही मोठी ताकद आहे. मात्र यासाठी सर्वप्रथम मतदार यादीत नाव नोंदणे अत्यावश्यक आहे, असे मत “एआयएसएसएमएस’चे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. नाना शेजवळ यांनी व्यक्त केले.
लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक आणि “एआयएसएसएमएस’चे अभियांत्रिकी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार नावनोंदणी विशेष शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अश्विनी गोडबोले व बीएलओ राजेश बहादूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी शेजवळ बोलत होते.