मुंबई – देशभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून अनेक राज्य लॉकडाऊन वाढवण्याच्या विचारात आहेत. अशात विद्यर्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. मात्र, शाळा कधी सुरु होणार हा प्रश्न अद्यापही पालकांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग असणाऱ्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात शाळा कधी सुरु कराव्यात यासंबंधी पालकांकडून मत मागवण्यास सांगितले आहे.
पालकांचे दोन प्रश्नांवर मंत्रालयाकडून मत मागवण्यात आले आहे. यामधील पहिला प्रश्न म्हणजे, ऑगस्ट, सप्टेंबर की ऑक्टोबर कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणे पालकांना अनुकूल वाटते. दुसरे म्हणजे पालकांच्या शाळा सुरु झाल्यानंतर काय अपेक्षा असणार आहेत? यासाठी तीन दिवसांची डेडलाइन राज्यांना अभिप्राय नोंदवण्यासाठी देण्यात आली आहे. पालकांकडून २० तारखेपर्यंत अभिप्राय नोंदवण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
दरम्यान, अधिकाऱ्याने राज्यांना पत्र पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. अभिप्राय देण्यासाठी सोमवारची डेडलाइन असताना अद्यापही अनेक शाळांना याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचे समोर येते आहे.