लखनऊ – लॉकडाऊनदरम्यान देशभरातील विविध भागांमध्ये अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांसाठी योगी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या मजुरांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे, अशा मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत त्यांनी याबाबत निर्णय घेतला. याशिवाय इतर राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना आखल्या जाव्यात, असा आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. इतर राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांच्या टेस्टिंगची सुविधा व्हाव्यात, त्यांना सुखरुप उत्तर प्रदेशमध्ये आणलं जाईल. उत्तर प्रदेशमध्ये हे मजुर आल्यानंतर त्यांना बसमार्फत त्यांच्या जिल्ह्यात किंवा गावात पोहोचवलं जाईल, असे ते म्हणाले.
जगभरात थैमान घालणारा करोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खबरदारी म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित केलं. या लॉकडाऊनदरम्यान देशातील सर्व राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. त्यामुळे लाखो मजुर विविध राज्यांमध्ये अडकले. या मजुरांच्या जेवणाची आणि इतर व्यवस्था त्याभागाताली राज्य सरकार करत आहेत.
लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्रातही उत्तर प्रदेशचे अनेक मजूर अडकून पडले आहेत. त्यांची योग्यप्रकारे व्यवस्था व्हावी, यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन त्यांची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. उद्धव ठाकरे यांनी मजुरांना सर्व गोष्टींची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं आहे.