पुणे – “करोनामुळे 2021 ची जणनगना झाली नाही. परंतु दरम्यानच्या काळात लोकसंख्या वाढली, महापालिकेच्या हद्दीत गावे समाविष्ट झाली. साहजिकच लोकप्रतिनिधींची संख्या वाढली गेली पाहिजे. परंतु त्या विरोधात आताचा सत्ताधारी पक्ष न्यायालयात गेला. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला, असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेस न्यायालयात कधी गेली, कशासाठी गेली, तर लवकराच लवकर निवडणुका घ्यावा, यासाठी गेली. मग बिघडलं काय? असा सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमुळेच महापालिका निवडणुकांना विलंब होत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यावर पवार म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होऊन लोकप्रतिनिधींचे राज्य यावे. आज सव्वा वर्षे झाले. लोकांना प्रतिनिधित्व मिळत नाही. त्यासाठीच आम्ही न्यायालयात गेलो, तर बिघडले कुठे?” असा प्रश्न पवारांनी विचारला.
दिल्या घरी सुखी राहा…
पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता पवार म्हणाले, “अरे बापरे, आता आमचे काही खरे नाही. बारामती लोकसभा मतदार संघामध्ये आता मला जीवाचे रान करावे लागेल. त्यांना आम्हीच आमदार केले. बॅंकेचे चेअरमन केले, आमदार केले, काही प्रश्न आहेत. ते येथे सांगणे योग्य नाही. त्यांच्या गावात सरपंच पदावर त्यांचा माणूस करता आला नाही, म्हणून हे नाराज झाले आणि गेले. दिल्या घरी तू सुखी राहा,’ असेच आमचे म्हणणे असल्याचे पवार म्हणाले.