Actress Akshaya Gurav : हो आमचा घटस्फोट झालाय; अखेर अभिनेत्री अक्षया गुरव हिने मौन सोडलं म्हणाली “मला स्वत:ला…”
Actress Akshaya Gurav : मात्र, गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि पती भूषण वाणी यांच्याशी विभक्त झाल्याबाबत चर्चा सुरू होती. अखेर अक्षयाने स्वतःच यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे.

Actress Akshaya Gurav : मराठमोळी अभिनेत्री अक्षया गुरव हिने अखेर आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर मौन सोडले आहे. पती आणि दिग्दर्शक भूषण वाणी यांच्यापासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत अक्षयाने एका मुलाखतीत दोघांचा घटस्फोट झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, घटस्फोटानंतरही आपण दोघे चांगले मित्र असल्याचे तिने सांगितले.
लोकप्रिय मालिकांमधील भूमिकांमुळे घराघरात पोहोचलेल्या अक्षयाचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांशी सातत्याने संवाद साधत असते. मात्र, गेल्या काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि पती भूषण वाणी यांच्याशी विभक्त झाल्याबाबत चर्चा सुरू होती. अखेर अक्षयाने स्वतःच यावर स्पष्टपणे भाष्य केले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटाबाबत बोलताना अक्षया म्हणाली, “माझ्या घटस्फोटाच्या बातम्या जेव्हा लागोपाठ दिसायला लागल्या, तेव्हा मला वाटलं की माझ्या परवानगीशिवाय तुम्ही माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी कसं बोलू शकता? मी हे पहिल्यांदाच सांगतेय की हो, आमचा घटस्फोट झालाय. पण आम्ही आजही चांगले मित्र आहोत.”
पुढे ती म्हणाली की, दोघेही एकाच इंडस्ट्रीत काम करत असल्याने भविष्यात वेळ आली तर एकत्र काम करण्यासही दोघांना आवडेल. मात्र, आयुष्यात काही गोष्टी सोडून पुढे जाणेही शिकले पाहिजे, असे मत तिने व्यक्त केले.
‘मला पुन्हा लग्न करायचं आहे’
या मुलाखतीत अक्षयाने आपल्या भविष्यातील आयुष्याबाबतही मनमोकळेपणाने भाष्य केले. गेल्या दोन वर्षांपासून आपण या कठीण काळातून जात असल्याचे सांगत तिने भविष्यात पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली की, “एक नातं बिघडलं म्हणून आयुष्यात पुढेही तसंच होईल, असं नाही. लग्नसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला पुन्हा लग्न करायचं आहे आणि छान संसार करायचा आहे. आयुष्यात असा पार्टनर हवा आहे, ज्याच्यासोबत मी सगळं काही शेअर करू शकेन. योग्य वेळ आली तर मी नक्कीच याचा विचार करेन. पुढे जाऊन मला लग्नही करायचं आहे. मात्र, सध्या ती वेळ नाही. सध्या मिळालेल्या संधीचा उपयोग मला माझ्या कामासाठी करायचा आहे. मला स्वतःला सिद्ध करायचं आहे,” असेही ती म्हणाली.
अक्षया गुरवचा अभिनयप्रवास
कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, अक्षया गुरवने विविध मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील भूमिकेमुळे ती विशेष चर्चेत आली. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या लोकप्रिय मालिकेमुळेही ती घराघरात पोहोचली. तिने ‘स्कॅम १९९३’ या लोकप्रिय वेबसीरिजमध्येही काम केले असून, ‘फुले’ या चित्रपटात समाजसुधारक फातिमा शेख यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘रानटी’, ‘श्यामची आई’ आणि ‘लव्ह लग्न लोचा’ यांसारख्या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे. अक्षयाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत आता स्पष्टपणे भूमिका मांडली असली तरी, भविष्यात ती कोणत्या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.






