कंडक्टरने बेल दिली. “चला, पिंपळवंडी फाटा उतरून घ्या.’ बस थांबताच उतरणाऱ्यांची लगबग चालू झाली. “ये म्हातारे, काय भरलंय एवढं बोचक्यात?’ म्हणत कंडक्टरने त्या म्हातारीच्या डोक्यावर बोचकं टेकवलं. पाठीमागून साखरे गुरुजी संदूक पुढे सरकवत उतरू लागले. दोरीत अडकवून गळ्यात लोंबत सोडलेला चश्मा डोळ्यावर चढवत गुरुजींनी कंडक्टरला विचारलं. इथून पिंपळवंडी किती लांब आहे? चार किलोमीटर. ऊन चांगलंच डोक्यावर आलं होतं. गुरुजींनी डोक्यावर पंचा घेतला आणि गावाच्या दिशेने चालू लागले. दगडधोंड्याची वाट तुडवत चालताना कधी पाय धोतरात घुटमळायचे आणि ते सावरायला जाईपर्यंत गळ्यातल्या शबनमने “माती’ खाल्लेली असायची! गुरुजी चार पावलं चालले; की मागे वळून बघायचे. एखादी गाडी येईल आणि आपली पायपीट थांबेल. असं करता करता गुरुजींनी दोनेक फर्लांगचं अंतर कापलं; पण गाडीच काय साधी बैलगाडी देखील रस्त्याने आली नाही! चालून दम लागला म्हणून गुरुजी झाडाखाली सावलीला थांबले. तेवढ्यात मडगाडचा खडखड आवाज करत एक धिप्पाड काळाकुट्ट माणूस सायकल हातात घेऊन येताना त्यांना दिसला. त्याने सायकल झाडाला टेकवली आणि जमिनीवर पोतं अंथरलं. सायकलवरचे पाटे-वरवंटे खाली उतरवत तो माणूस पोत्यावर मांडी घालून बसला. त्याच्या सोबत साधारण बारा-एक वर्षांचा मुलगाही होता. गुरुजी त्या पोराकडे पाहत होते. उन्हाने काळवंडलेला चेहरा, अंगात कळकटलेला सदरा, ठिगळ लावलेली चड्डी आणि पायात तुटलेल्या बंदाला काटापिनने जोडून घातलेली चप्पल. “हिंगं इकडं येशीला का?’ त्या पोराच्या बापाने आवाज देताच ते उठून बापाजवळ गेलं. “पाट्याला चरा पाडून घ्ये.’ त्याने हातात हातोडा आणि छन्नी घेऊन पाट्याला चरा पाडायला सुरुवात केली. ठक ठक आवाज करत काम चालू असतानाच; गुरुजींच्या कानावर शब्द पडले. “”कुटं जायचंय पाव्हणं?” त्या पोराकडे एकटक पाहत बसलेले गुरुजी भानावर येत,””पिंपळवंडीला.” “”कुणाकडं?” “”हरिदास सुतारच्या घरी. त्याची खोली घेतली आहे भाड्याने राहण्यासाठी.” “”त्यो सुताराचा हऱ्या व्हय? पर हिथं?” “”शाळेवर शिक्षक म्हणून रुजू व्हायचंय.” शिक्षक; असं ऐकताच एवढा वेळ चालू असलेली ठक ठक थांबली आणि ते पोरगं साखरे गुरुजींच्या तोंडाकडं पाहू लागलं. पोराचा बाप लगबगीनं उठून गुरुजींच्या समोर आदबीनं हात जोडून उभा राहिला. “”मला म्हाईत नव्हतं तुमि मास्तर हाय त्ये.” गुरुजींनी हसल्यासारखं केलं आणि त्याला हात जोडले. “”म्या किशा. आन ह्ये माजं पोरगं मल्हार.” गुरुजींनी मल्हारकडं पाहताच; हातातला हातोडा आणि छन्नी खाली टाकून देत तो तटकन उभा राहिला. “”बस खाली. तुझं काम चालू दे.” तो मध्येच भेदरलेल्या नजरेनं गुरुजींकडं पाहायचा आणि त्यांची नजरानजर झाली; की झटकन पापणी पाडून आपली नजर त्या छन्नीवर खिळवायचा.
गुरुजींनी संदूक उचलली आणि चालू लागले. तेवढ्यात, “”ये मल्हारा, त्यो हातोडा सोड आन मास्तरला त्या सुताराच्या घरापस्तर सोडून ये.” मल्हार ताडकन उठला आणि हातात सायकल घेऊन गुरुजींच्या बाजूला येऊन उभा राहिला. “”कशाला उगीच त्याला त्रास. जाईल मी.” “”असं कसं? तुमी आमच्या मल्हारचं मास्तर हायती. त्यात कसला आलाय तरास?” तोपर्यंत इकडे मल्हारने गुरुजींच्या हातातून संदूक घेत सायकलवर ठेवली सुद्धा! “”बरं. निघतो मी.” असं म्हणून गुरुजी मल्हारबरोबर चालू लागले. “”कितवीत आहेस?” “”सहावीत.” “”कुठला विषय आवडतो?” “”चित्रकला.” “”आणि बाकीचे?” मल्हार चालता चालता मध्येच थांबला आणि खाली सरकलेली आपली चड्डी एका हाताने वर ओढत बोलू लागला. “”बाकीच्ये पण आवड्त्याल. पर गुरुजी चांगलं असलं पायजेल. आदीचं गुरुजी लई मारायचं.” साखरे गुरुजींनी त्याच्याकडे पाहून हसल्यासारखं केलं. समोर गावचं शिवार नजरेस पडत होतं. “”आलं वाटतं गाव.” “”व्हय. त्या समोरल्या आंब्याच्या कडंलाच सुताराचं घर हाय.” “”आणि शाळा कुठंय?” “”आता पूडं ईलच बगा. खात्या हातालाच हाय.” मल्हारच्या बोलण्याला गुरुजी हसू लागले. “”उजव्या हाताला म्हणावं.” शाळा दिसली. इनमीन दोन खोल्यांची! पटांगणात वाढलेलं गवत आणि ऐसपैस पडलेली गुरंढोरं पाहून गुरुजी स्वतःशीच पुटपुटले. “शाळेला आधी तिची स्वतःची ओळख करून द्यावी लागेल आणि मग साखरे गुरुजी तुमची!’ “”गुरुजी, घर आलं.” गुरुजींनी पिशवीतून डब्बा काढला. “”हे घे.” “”नको गुरुजी.” “”आरे घे रे.” मल्हारने हळूच हात पुढे केला. गुरुजींनी त्याच्या हातावर खोबऱ्याची वडी टेकवली. मटकन ती तोंडात टाकून मल्हार परत निघाला. “”उद्या शाळेत ये रे.” “”व्हय व्हय.”
दुसऱ्या दिवशी शाळेत नवीन गुरुजींना आपली ओळख करून देताना काही पोरं एखाद्या भटजीने मंत्र म्हणावा तशी तोंडातल्या तोंडात पुटपुटायची; तर काही भीतभीतच उभी राहून फक्त आपलं नाव सांगून पायाच्या अंगठ्याने जमीन उकरल्यासारखी करत बसायची! गुरुजी त्यांच्याजवळ जाऊन कधी कुणाच्या शर्टाचं खाली-वर झालेलं बटन जागेवर लावून देत; तर कधी कुणाची दुमडलेली कॉलर सरळ करत प्रेमाने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत. हातात खडू घेऊन गुरुजींनी एकदाचा श्री गणेशा केला! कधी संध्याकाळचे पाच वाजले कळलंच नाही. शाळा सुटली आणि पोरं निघून गेली. “चला, शिक्षकाची जबाबदारी संपली. आता चपराशाची पार पाडू या!’ म्हणत त्यांनी खराटा हाती घेतला. निखळलेले दगड पुन्हा कुंपणाच्या भिंतीवर ठेवताना गुरुजींचं गुणगुणनं चालू होतं. “ओढाळ वासरू रानी आले फिरू, कळपाचा घेरू सोडूनिया…’ आणि तेवढ्यात पाठीमागून त्यांच्या सुरात एक सूर मिसळला. “कानामध्ये वारे भरूनिया न्यारे, फेर धरी फिरे रानोमाळ…’ “”मल्हार तू!” मल्हारने गुरुजींच्या हातातला दगड घेत भिंतीवर मांडला. “”शाळेत का नाही आलास आज?” “”गुरुजी, बा नं आज खालच्या वाडीवर पाटं इकायला पाटवलं होतं. उद्यापासनं येतू.” गुरुजींच्या हातातला खराटा घेत,””गुरुजी, तुमि बसा. म्या करतू साफ.” “”नाही जा तू घरी. अंधार पडायला आलाय. आई वाट बघत असेल.” “”नाय.” “”अरे नाही काय? तुला नाही माहिती आईचं काळीज कसं असतं. त्या कवितेतल्या हरवलेल्या वासराला शोधायला जशी त्याची माय येते ना तशीच तुझी…” गुरुजी पुढे काही बोलायच्या आत मल्हार हिरमुसलेल्या चेहऱ्यानं घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी पोरांच्या घोळक्यात मल्हारला शोधताना गुरुजींच्या मनातली अस्वस्थता; तो दिसताच एका क्षणात दूर झाली. कधी हसून खेळून; कधी कान पकडून; तर कधी एखाद्याच्या हातावर छडी दिल्यानंतर त्याला मायेनं जवळ घेऊन, “तुला शिकून मोठं व्हायचंय ना? मग अभ्यास करायचा बरं.’ असं म्हणून त्या कोवळ्या मनावर घातलेली फुंकर; पोरांच्या हातावरचे आणि मनावरचे वळ पुसून टाकत होती! एखाद्या दिवशी मल्हार दिसला नाही; की गुरुजींना चुकल्यासारखं वाटायचं. आणि त्यालाही!
पुस्तकाची पानं उलटावीत तशी वर्षे भराभरा सरत गेली. शाळेला आता स्वतःची खरी ओळख झाली होती. पोरांच्या शर्टाची बटणं आता खालीवर लागत नव्हती! इकडे पोरांना अभ्यासाची गोडी लागली आणि छडीला जणू सक्तीची रजाच मिळाली! कवितांना लय आणि सूर गवसला होता; विज्ञानाच्या चमत्काराचे आता पारावर “पारायणं’ होत होती; महाराजांच्या शौर्यगाथा ऐकताना, “हर हर महादेव’च्या गजरानं आसमंत दणाणून निघायचा; तर पोरांचं इंग्रजी आता एवढं सुधरलं होतं; की जणू एकेकाळी इंग्रजांचं विमान पिंपळवंडी बु.ला तर “लॅंड’ (मुक्कामी) झालं नसेल ना..! शाळेचं कुंपण आता भक्कम झालं होतं आणि पोरांनी त्यांच्याबाजूचं अज्ञानाचं कुंपण कधीच तोडलं होतं! पण या भक्कम कुंपणाचा एक दगड निखळून पडावा; तसं एक दिवस साखरे गुरुजींना ही शाळा आणि हे गाव सोडून जावंच लागणार होतं. आपल्या लाडक्या गुरुजींना निरोप देताना आठवण म्हणून कुणी त्यांना गुलाब देत होतं; तर कुणाच्या डोळ्यात पाणी होतं. आख्ख गाव त्यांना निरोप द्यायला आलं होतं. आजही गुरुजींची नजर त्या घोळक्यात मल्हारलाच शोधत होती; पण मल्हार कुठे दिसत नव्हता. काही वेळाने बस आली. गुरुजी बसमध्ये चढणार तेवढ्यात मल्हार धापा टाकत तिथे आला. “गुरुजी.’ मल्हारचा आवाज ऐकून गुरुजी थबकले. मल्हार गुरुजींच्या पाया पडला. “”कुठे होतास?” “”गुरुजी, हे तुमच्यासाठी.” मल्हारने कापडात काहीतरी गुंडाळून आणलं होतं. गुरुजींनी मल्हारच्या तोंडावरून हात फिरवला आणि गाडीत बसले. आपल्या लाडक्या विद्यार्थ्याने काय दिलंय ते पाहण्यासाठी न राहवत त्यांनी ते कापड सोडलं. त्यात दगडात कोरलेली सरस्वतीची एक सुंदर मूर्ती होती आणि सोबत एक चिट्ठी. “मूर्ती कोरायला माझ्या आईने मला शिकवलं होतं आणि त्या मूर्तीची पूजा करायला तुम्ही! गुरुजी, आता अंधार पडला तरी माझी माय मला नाही शोधत येत. तीच एका गर्द काळोखात हरवलीय!’ गाडी चालू झाली आणि गुरुजी भरल्या डोळ्यांनी खिडकीतून बाहेर बघू लागले. मल्हार त्या बाभळीच्या झाडाखाली पुन्हा हातात हातोडा आणि छन्नी घेऊन बसला होता. गुरुजींच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं आणि त्याच्याही! त्या “येड्या बाभळीचा’ काटा; आजही त्यांच्या हृदयात तेवढाच खोल रुतून बसला होता!
आठवण
अमोल भालेराव