सातारा शहराचा पश्चिम भाग हा कायमच सातारकरांसाठी निवांत क्षणांसाठी पहिली पसंती म्हणून ओळखला जातो. सातारा शहराकडून यवतेश्वर, कास, बामणोलीकडे जाणाऱ्या यवतेश्वर घाटातून रात्रीच्या अंधारात शहराचे उजळून निघालेले विहंगम दृश्य पहायला मिळते. त्यामुळे संध्याकाळी या घाटात अनेकजण आपल्या मित्रांसोबत किंवा परिवारासोबत निवांत क्षण घालवताना पहायला मिळतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून हा घाट मार्ग तळीरामांच्या रडारवर आला आहे.
अंधार पडताच घाटातील रस्त्याच्या कडेच्याच कठड्यावर आणि डोंगरावर मद्यपींची ठोळकी दारूच्या बाटल्या बिनदिक्कतपणे रिचवत बसलेली नजरेस पडतात. यातील काहीजण मध्यरात्री उशीरापर्यंत आपल्या चारचाकी वाहनांतील म्युझिक सिस्टिमचा आवाज मोठा सोडून धिंगाणा घालत असतात.
दरम्यान, याठिकाणी भरत असलेल्या तळीरामांच्या बैठका कधीतरी होणाऱ्या नाममात्र कारवाईमुळे दिवसेंदिवस फोफावत चालल्या आहेत. यापूर्वी या घाटात खुन, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, प्रेमी युगुलांची लुटमार यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. त्यामुळे आणखी एखादा गुन्हा किंवा दुर्घटना घडण्याच्या आधीच या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलत कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
कास पठाराचा परिसर गेल्या काही वर्षांपासून देशभरात प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे या मार्गावर पर्यटनपूरक व्यवसाय म्हणून काही स्थानिक तर बहुतेक धनदांडग्या लोकांनी हॉटेल्स, धाबे सुरू केले आहेत. यातील बहुतांश ठिकाणांवर रात्री उशिरापर्यंत जेवणावळी बरोबरच दारूच्या पार्ट्या झडत असतात. याठिकाणी जेवणावळीसाठी जाणारे काही जण जाताना वाटेतील यवतेश्वर घाटात दारू पीत बसलेले असतात. तर काहीजण जेवणावळी उरकून मद्यधुंद अवस्थेत घाटात धिंगाणा करताना पाहायला मिळतात. त्यामुळे कास मार्गावरील वाढते हॉटेलीकरण यवतेश्वर घाटातील मद्यपींच्या वावराला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे.