Yami Gautam: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या ‘धुरंधर २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिची भूमिका लहान असली तरी ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. यामागचं कारण म्हणजे तिचा एक जुना व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये दिलेल्या एका मुलाखतीचा आहे. त्या मुलाखतीत यामी गौतमला तिच्या ‘राष्ट्रवादी’ चित्रपटांच्या निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली होती, “राष्ट्रवादी असणं कधीपासून चुकीचं झालं? मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. माझ्या कलेद्वारे मी प्रेक्षकांसाठी काम करते आणि चांगल्या कथा सांगणं हेच माझं उद्दिष्ट आहे.” यामी गौतमने याआधी उरी: द सर्जिकल स्ट्राइक, आर्टिकल ३७० आणि ‘हक’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या सर्व चित्रपटांमध्ये देशभक्ती किंवा राष्ट्रीय भावना अधोरेखित करण्यात आली आहे. त्यामुळे तिला ‘राष्ट्रवादी अभिनेत्री’ असा टॅग मिळाल्याची चर्चा अनेकदा झाली आहे. Yami Gautam on Dhurandhar या संदर्भात ती म्हणाली होती की, तिला भारताशी संबंधित भावना आणि वास्तव दाखवणाऱ्या कथा आवडतात. मात्र, फक्त विषय चांगला आहे म्हणून प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा, असं तिला वाटत नाही. चित्रपट एक उत्तम कलाकृती असणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असं ती स्पष्टपणे म्हणाली. दरम्यान, ‘धुरंधर २’ प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही प्रेक्षकांनी या चित्रपटाला ‘प्रोपगंडा’ असल्याचा आरोप केला आहे. यामी गौतमच्या जुन्या वक्तव्याशी जोडून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. काही युजर्सनी असा प्रश्न उपस्थित केला की, “जर खरंच सत्य दाखवायचं असेल तर एकाच व्यक्तीला लक्ष्य का केलं?” तर काहींनी चित्रपटातील काही पात्रांचं चित्रण पक्षपाती असल्याचा आरोप केला. एका युजरने लिहिलं की, “प्रोपगंडाला राष्ट्रभक्ती म्हणता येत नाही. देशात बेरोजगारी, महागाई, शिक्षण, महिलांची सुरक्षितता असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, तेही दाखवायला हवेत.” तर दुसरीकडे काही प्रेक्षकांनी यामी गौतमच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या मते, राष्ट्रवादी विषयांवर आधारित चित्रपट करणं चुकीचं नाही आणि काही लोक मुद्दाम वाद निर्माण करत आहेत. एकूणच, यामी गौतमच्या एका जुन्या वक्तव्यामुळे ‘धुरंधर २’ पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रवाद, चित्रपट आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया यावरून सोशल मीडियावर जोरदार वाद रंगला असून, हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.