प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नऊ हजार पोलिसांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे; पण यात पहिल्यांदा लेखी परीक्षा, की मैदानी चाचणी होणार यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.
राज्यात गृह खात्यातील सुमारे 29 हजार 401 पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यासाठी महाविकास आघाडी (मविआ) सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सात हजार पदांची भरती करणार असल्याचे घोषित केले होते. तसेच 24 जून 2022 रोजी महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवा प्रवेश) नियम 2011 मध्ये बदल करून प्रथम शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त उमेदवार लेखी परिक्षेसाठी पात्र असणार असल्याचे जाहीर केले होते.
पण मविआ सरकार कोसळले आणि रिक्त पदे भरण्याची घोषणा ही घोषणाच राहिली. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आणि पुन्हा एकदा पोलीस भरती सुरू करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जाऊ लागली. उमेदवारांची मागणी विचारात घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नऊ हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा केली आहे; पण मविआ सरकारने नियमात केलेला बदल तसाच राहणार का, बदलणार याबद्दल उमेदवारांमध्ये संभ्रम आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी पोलीस भरती प्रक्रियेत बदल करून पहिल्यांदा लेखी चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. मी गेले तीन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. सरकार बदलले की, या भरतीचे नियम बदलत आहेत. परिणामी मैदानी चाचणीचा सराव कसा करावा, लेखी परीक्षेची तयारी कशी करावी, हे कळत नाही.
-संजय शिंदे, उमेदवार