मुंबई – देशात पुन्हा एकदा करोनाचा धोका वाढ आहे. सध्या अनेक मोठ्या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसते. शनिवारी देशात 3 हजार 824 इतकी करोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाकडून देखील मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे ह्या करोनाच्या त्रिसुत्रांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मुंबईत मागील काही दिवसांपासून दररोज 100 हून अधिक करोना रुग्णांची नोंद केली जात आहे. मात्र काल 3 एप्रिल रोजी 75 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 2 एप्रिल रोजी 172 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर दिल्लीत दररोज 400 हून अधिक नव्या करोनाबाधितांची नोंद केली जात आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांत सक्रिय रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे. त्यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन गर्दीच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक परिसरामध्ये मास्क वापरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.